अजिंक्यतारा सुशोभीकरण आणि छत्रपती ताराराणी स्मारक उभारणी यांना शासनाची मान्यता !

अजिंक्यतारा गड

सातारा – सातारानगरीतील ऐतिहासिक अजिंक्यतारा गडाच्या आणि महाराणी ताराराणी समाधी परिसराचा विकास अन् सुशोभीकरण यांसाठी राज्यशासनाने मान्यता दिली आहे. यासाठी अनुक्रमे १३५ कोटी आणि १३३ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना विधानसभेमध्ये दिली.

पर्यटनवाढीसमवेत ऐतिहासिक वस्तूंचे जतन आणि संवर्धन यांच्या दृष्टीकोनातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. यामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वैभवात मोठी भर पडणार आहे. पर्यटकांच्या वेळेची आणि पैशांची बचत अन् शारीरिक कष्ट टाळण्यासाठी वासोटा गडावर जाण्यासाठी मुनावळे ते वासोटा या ‘रोप-वे’ला (तारांच्या साहाय्याने वाहतूक करणारी प्रणाली) मान्यता देण्यात आली आहे. कराड येथील विमानतळ विकास आणि विमानतळावर ‘नाईटलँडिंग’साठी (विमानाने रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे उतरण्यासाठी) मान्यता देण्यात आली आहे.

अजिंक्यतारा सुशोभीकरण !

ऐतिहासिक अजिंक्यतारा गड सुशोभीकरण आणि संवर्धन यांमध्ये गडावरील राजसदर, बुरुज, तटबंदी यांची दुरुस्ती करणे, पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करणे, अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था अन् परिसराचा विकास करणे, यांचा समावेश आहे.

छत्रपती ताराराणी समाधी परिसर सुशोभीकरण !

संगम माऊली येथील छत्रपती ताराराणी समाधी परिसर सुशोभीकरणामध्ये नदी घाट परिसर सुशोभीकरण आणि संवर्धन, विविध मंदिरांची दुरुस्ती, घाटावरील विविध स्मारकांचे संवर्धन, संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा यांचा समावेश आहे.