‘उठाव’ शब्दाऐवजी वर्ष १८५७ चे ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असा उल्लेख करावा !

  • महाराष्ट्र राज्य विश्वकोशात वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा ‘उठाव’ असा चुकीचा उल्लेख !

  • साहित्यिक अविनाश पाठक यांची विधान परिषदेच्या सभापतींकडे मागणी !

मुंबई – महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाच्या वतीने ‘विश्वकोशा’चे खंड प्रकाशित केले गेले आहेत. एका खंडात वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा उल्लेख ‘उठाव’ असा आहे. काही लोक याला ‘बंड’ म्हणतात, तर काही लोक ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणतात; पण वर्ष १८५७ मध्ये जे घडले, ते ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणूनच गौरवले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यातील एक सेनानी तात्या टोपे यांच्या स्वातंत्र्यसंघर्षावर विद्वान मराठी साहित्यिक वसंत वरखेडकर यांचे ‘सत्तावनचा सेनानी’ हे पुस्तकही गाजले आहे. अनेक मान्यवर लेखक, पत्रकार आणि समकालीन लोकनेते यांनीही हे ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणूनच गौरवले. त्यामुळे विश्वकोशातही याचा उल्लेख ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असाच व्हायला हवा होता; मात्र विश्वकोशातील तज्ञांनी त्याला ‘उठाव’ का म्हटले ? ते अनाकलनीय आहे. ‘महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळा’च्या अध्यक्षांनी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर आणि संबंधित खंडाच्या पुढील आवृत्त्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून ‘१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध होते’, असा उल्लेख करणे आणि वरील आदरणीय व्यक्तींचा सन्मानाने उल्लेख करणे याविषयी सूचना द्यावी, अशी मागणी मुक्त पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

साहित्यिक अविनाश पाठक म्हणाले,

१. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई इत्यादी स्वातंत्र्ययोद्ध्यांचा उल्लेख एकेरी करण्यात आला आहे. ही सर्व व्यक्तीमत्त्वे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी नेहमीच आदरणीय राहिली आहेत. त्यांनी दिलेला स्वातंत्र्यलढा ‘देशाच्या गौरवशाली इतिहासातील एक सोनेरी पान’ म्हणून नोंदला गेला आहे.

२. आज देशात ठिकठिकाणी या मान्यवर व्यक्तींची स्मारकेही उभारली गेली आहेत. तरीही महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोशात प्रस्तुत महान स्वातंत्र्ययोद्ध्यांचा उल्लेख एकेरी करणे म्हणजे त्यांच्या कार्याचा अवमान आहे.

३. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळात अनेक तज्ञ आणि जाणकार व्यक्ती असतांनाही अशा महान व्यक्तींचा असा एकेरी उल्लेख व्हावा, ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे.

४. हे पत्र सभागृहाच्या विनंती अर्ज समितीकडे याविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी सोपवावे आणि त्याद्वारे पुढील पालट करण्याची सूचना द्यावी.

संपादकीय भूमिका 

पाश्चात्त्य इतिहासकारांचा भारतीय इतिहासलेखनावरील प्रभाव दूर सारून भारतीय विचारांच्या मुशीतून इतिहास समजून घ्या !