स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गांधीहत्येत विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला ! – प्रखर श्रीवास्तव, लेखक

नवी मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना म. गांधी यांच्या हत्येत विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला होता, असे विधान ‘हे राम – गांधी हत्याकांड की प्रामाणिक पडताल’ या पुस्तकाचे लेखक श्री. प्रखर श्रीवास्तव यांनी वाशी येथे केले. या पुस्तकाची २ वर्षांत नववी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ अन् सावरकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावरकर आत्मार्पणदिना’निमित्त श्री. श्रीवास्तव यांची मुलाखत ‘सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष श्री. संतोष कानडे यांनी घेतली.

श्री. श्रीवास्तव म्हणाले की, २० जानेवारीला गांधींच्या हत्येचा प्रयत्न होतो, त्यात मदनलाल पकडला जातो. कटाचा मुख्य सूत्रधार हा महाराष्ट्रातील ‘अग्रणी’ वृत्तपत्राचा संपादक असल्याची माहिती मदनलाल पोलिसांना देतो, तरीही ‘३० जानेवारीला नथुराम बिर्ला भवनमध्ये गांधींची हत्या करतो’, तर यात देहली, मुंबई, पुणे, कर्णावती पोलिसांचा निष्काळजीपणा ही अक्षम्य चूक होती.

‘लहानसहान गोष्टींवर उपोषण करणार्‍या गांधींनी फाळणीसारख्या गंभीर विषयावर उपोषण का केले नाही ?’ हा प्रश्न अनुत्तरित आहे. मुसलमान तुष्टीकरणाचे राजकारण, वर्ष १९४२ चे फसलेले आंदोलन, इच्छाशक्तीचा अभाव ही देशाच्या फाळणीची कारणे आहेत. पाकिस्तानला दिलेले ५५ कोटी रुपये, विस्थापितांविषयी गांधींचा भेदभाव यांतून नथुरामची गांधीहत्येची स्पष्ट भूमिका सिद्ध झाली. बडगेच्या खोट्या साक्षीच्या आधारावर सावरकर यांचे चारित्र्य कलंकित करण्याचा प्रयत्न केला गेला. संघाचा काडीमात्र संबंध नसतांना द्वेषभावनेतून संघावर बंदी घालण्यात आली. गांधीहत्येमुळे देशातील हिंदुत्व विचारसरणीची अपकीर्ती करण्याची आयती संधी काँग्रेसला मिळाली, असे श्री. श्रीवास्तव या वेळी म्हणाले.

फाळणीला उत्तरदायी कोण ?, गांधी हत्याकांडाची कारणे, नथुराम गोडसे यांची भूमिका, गांधींच्या सुरक्षेत झालेला हलगर्जीपणा, गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत ब्राह्मणांचे केलेले हत्याकांड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नाहक बंदी, गांधी हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीला घ्यावी लागलेली माघार अशा अनेक विषयांवर या वेळी विचारलेल्या प्रश्नांना श्री. श्रीवास्तव यांनी आपल्या प्रखर शब्दांत उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जांभळे यांनी केले. उद्घाटनप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनी केले.