Divorce Cases : गेल्या २० वर्षांत घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ !

  • महिला घेत आहेत घटस्फोटांसाठी पुढाकार

  • मेट्रो शहरांमध्ये गेल्या ३ वर्षांत घटस्फोटांचे प्रमाण तिप्पट गतीने वाढले !

नवी देहली – भारतात गेल्या २० वर्षांत घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २० वर्षांपूर्वी देशात ०.६ टक्के महिलांनी घटस्फोट घेतला होता, तर आता हे प्रमाण १ टक्के झाले आहे. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’तून ही आकडेवारी समोर आली आहे. वर्ष १९८६-८७ नुसार घटस्फोटाच्या ८४९ प्रकरणांपैकी ५७० प्रकरणांत पतींनी घटस्फोटाची मागणी केली होती. हे प्रमाण ६७ टक्के होते; पण आता सुमारे ५८ टक्के महिला घटस्फोटासाठी पुढाकार घेत आहेत. याचा अर्थ पुरुषांनी घटस्फोट मागण्याचे प्रमाण ६७ टक्क्यांवरून ४२ टक्के झाले आहे.

१. मुंबई कौटुंबिक न्यायालयाच्या एका अभ्यासानुसार ४० टक्के प्रकरणांत लग्नानंतर ३ वर्षांतच संबंध दुरावतात. घटस्फोट मागणार्‍या महिला २५ ते ३४ वयोगटातील आहेत.

२. महाराष्ट्रात १८.७ टक्के, कर्नाटक ११.७ टक्के, बंगाल ८.२ टक्के, देहली ७.७ टक्के,  तमिळनाडू ७.१ टक्के, तेलंगाणा ६.७ टक्के आणि राजस्थानमध्ये २.५ टक्के घटस्फोटांचे प्रमाण आहे.

३. ‘एडजुआ लीगल्स गूगल अ‍ॅनालिटिक्स २०२५’च्या अहवालानुसार लक्ष्मणपुरी, देहली, मुंबई, कोलकाता, भाग्यनगर आणि बेंगळुरू या शहरांत गेल्या ३ वर्षांत घटस्फोटाची प्रकरणे ३ पटींनी वाढली आहेत.

संपादकीय भूमिका

अध्यात्मशास्त्र आणि धर्मशास्त्र यांनुसार विवाह म्हणजे प्रारब्धभोग भोगण्यासाठी एकत्र येणे. हे भोग भोगतांनाच क्रियामाण कर्म वापरून पती-पत्नी यांनी साधना केली, तर ते ईश्‍वराच्या कृपेने चांगल्याप्रकारे संसार करून आनंदी जीवन जगू शकतात. असे होण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.