मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठीचा ठराव मराठी संमेलनात न घेतल्याविषयी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी खंत व्यक्त केली

पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, यासाठी ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ने गेले कित्येक मास राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर ९ जानेवारीपासून गोव्यात पणजी येथे प्रारंभ झालेल्या ‘जागतिक मराठी संमेलना’त गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव न घेतल्याने ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’चे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना खंत व्यक्त केली आहे.

प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘जागतिक मराठी संमेलना’त ठराव घेतला जात नाही, अशी संमेलनाची प्रथा असल्याचे आयोजक सांगतात. यामुळे संमेलनाच्या आयोजकांनी मर्यादा ओलांडली असे समजून मराठीप्रेमींनी प्रक्षोभक व्हायचे का ? सरकारसमवेत कार्यक्रम केल्याने आयोजक असमर्थता व्यक्त करतात का ? असे प्रश्न उपस्थित होतात. भाजपला मिळणार्‍या सर्व मतांमधील ८५ टक्के मते ही मराठीप्रेमी लोकांची असतात आणि यामधील ६० टक्के लोक भाजपला मतदान न करता राहू शकतात, असा आम्हाला विश्वास आहे. यामुळे भाजपला जाग येते का ? हे पाहूया.’’

याविषयी स्पष्टीकरण देतांना ‘‘जागतिक मराठी संमेलना’च्या आयोजनातील एक सदस्य असलेले प्रा. अनिल सामंत म्हणाले, ‘‘जागतिक मराठी संमेलना’त शेवटी ठराव घेण्याची प्रथा नाही; मात्र संमेलनातील विविध सत्रांमध्ये अनेक वक्त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केलेली आहे.’’