Iqbal Ansari  : काश्मिरी युवक तेथे कसा आणि कुठून आला ?

श्रीराममंदिरात मुसलमानाने केलेल्या नमाजपठणाच्या घटनेवर मुसलमान पक्षकार इक्बाल अन्सारी यांची प्रतिक्रिया

मुसलमान पक्षकार इक्बाल अन्सारी

अयोध्या (उत्तरप्रदेश) – जम्मू-काश्मीरमधील अबू अहमद शेख याने श्रीराममंदिरात घुसून नमाजपठण, तसेच ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’, याच्या) घोषणा दिल्या. यावर सर्वत्र विरोध होत असून श्रीरामजन्मभूमी प्रकरणातील मुसलमान पक्षाचे याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मंदिरातील प्रार्थनेमध्ये कोणताही अडथळा किंवा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे. काश्मिरी युवक तेथे कसा आणि कुठून आला ? राममंदिरात नमाजपठण करण्याची आवश्यकता त्याला का भासली ? तसेच यासाठी उत्तरदायी असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

अन्सारी यांनी सांगितले की, अयोध्या हे धार्मिक शहर असून सर्व धर्मांच्या लोकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. (हे हिंदूंच्या श्रद्धेचेच स्थान आहे ! किमान उत्तरप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेत्यांनी तरी अन्सारी यांच्या या निराधार वक्तव्यावर आक्षेप घेतला पाहिजे ! – संपादक) हिंदु, मुसलमान, शीख, ख्रिस्ती सर्वजण येथे बंधुभावाने रहातात. प्रत्येक धर्मासाठी स्वतंत्र पूजास्थळे उपलब्ध आहेत. राममंदिर उभे राहिले आहे आणि मुसलमानांसह संपूर्ण देशातील लोकांनी मंदिराचा सन्मान केला आहे.

श्रीराममंदिरातील घटना अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी ! – भाजप

अशा प्रकारच्या बातम्या येणे अत्यंत निंदनीय अन् दुर्दैवी आहे. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची निश्चिती करतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांनी व्यक्त केला.