श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नामक्कल (तमिळनाडू) येथील अरुलमिगु नरसिंह स्वामी मंदिर आणि आंजनेयार मंदिर येथे घेतले दर्शन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

तमिळनाडू – सप्तर्षि जीवनाडीपट्टीमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार ४ जानेवारी २०२६ या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तमिळनाडूतील नामक्कल येथील अरुलमिगु नरसिंह स्वामी मंदिर आणि अंजनेयार मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचक पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांची वंदनीय उपस्थिती होती.

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उपस्थितीत अंजनेयार मंदिरातील हनुमंताच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. या वेळी अभिषेक करून देवाला सोन्याचे अलंकार घालण्यात आले, तसेच सायंकाळच्या पूजेच्या वेळी हनुमंताला लोणी अलंकार परिधान करण्यात आले होते. हनुमंताच्या लोणी अलंकार पूजेच्या वेळी हनुमंताच्या मूर्तीला १२० किलो लोणी लावण्यात येते. सायंकाळी हनुमंताचा रथ प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर पडतो. त्या वेळी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हनुमंताचा रथ ओढला. हनुमंताची मूर्ती १८ फूट उंचीची असून ‘प्रतिदिन मूर्तीची उंची वाढते’, असे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिरातील मूर्तीच्या वर छत नाही. इरोड येथील श्री. सुंदरराजन् यांनी या मंदिरात अभिषेकाचे आयोजन केले होते.

१२० किलो लोणी लेपन केलेले श्री अंजनेय (हनुमंत)

पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या ठिकाणी असणार्‍या मुख्य नरसिंह मंदिरात जाऊन नरसिंह अन् श्री महालक्ष्मीदेवी यांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि साधक यांचे आरोग्य चांगले रहावे, आश्रमाच्या बांधकामातील आणि भूमी संदर्भातील अडथळे दूर व्हावेत, तसेच साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, अशी प्रार्थना केली.

नामक्कल तीर्थक्षेत्र

नामक्कल किंवा नामगिरी हे तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपालिका आहे. नामक्कल हे किमान ७ व्या शतकातील एक ऐतिहासिक शहर आहे. नामक्कल हे नाव नामगिरीवरून आले आहे, जे शहराच्या मध्यभागी असलेल्या एका खडकाच्या रचनेचे नाव आहे. नामक्कल येथील दोन गुहा मंदिरांना ‘आदियेंद्र विष्णुगृह’ (श्री रंगनाथस्वामी मंदिर) आणि ‘आदियानव्य विष्णुगृह’ (नरसिंह स्वामी मंदिर) असे म्हणतात. हे दगडी मंदिर आदियमान वंशाच्या राजाने बांधले होते. पल्लवांशी त्याच्या वैवाहिक संबंधांमुळे ही मंदिरे ७ व्या शतकात पल्लव स्थापत्यशैलीने बांधली गेली.

 


अरुलमिगु नरसिंह स्वामी मंदिर आणि आंजनेयार मंदिर

‘अरुलमिगु नरसिंह स्वामी मंदिर’ नावाच्या या मंदिरात श्री नामगिरी थायर म्हणजे देवी श्री महालक्ष्मी भगवानांच्या मांडीवर बसलेल्या नसून त्यांच्या छातीजवळ आहेत.

नरसिंह मंदिराची कथा पुढीलप्रमाणे

श्री लक्ष्मी आणि नरसिंह

एकदा श्री अंजनेय गंडकी नदीत स्नान करत असतांना त्यांना भगवान श्रीविष्णूच्या आकाराचे एक शाळिग्राम आढळले. ते शाळिग्रामासमवेत नामक्कल या ठिकाणी आले. तेथे त्यांनी स्नान करण्याचा विचार केला; पण ‘शाळिग्राम पृथ्वीवर ठेवू नये’, असे असल्याने ते स्नान करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांना तेथे देवी श्री महालक्ष्मी भगवान नरसिंहाचे दर्शन मिळण्यासाठी तपश्चर्या करतांना दिसली. श्री अंजनेयाने स्नान करून परत येईपर्यंत देवी श्री महालक्ष्मीला शाळिग्राम हातात धरण्याची विनंती केली. तिने सांगितले की, जर अंजनेय निर्धारित वेळेत परतले नाहीत, तर ती शाळिग्राम खाली ठेवेल. अंजनेय वेळेवर परत येऊ शकले नाहीत. त्यामुळे देवीने शाळिग्राम भूमीवर ठेवला, जो नंतर अंजनेय हलवू शकले नाहीत. नंतर हळूहळू तो वाढून शैलग्राम पर्वतात रूपांतरित झाला. तेथे भगवान नरसिंहांनी देवी महालक्ष्मीला दर्शन दिले आणि ते ‘श्री लक्ष्मी नरसिंह’ झाले. तेव्हापासून भगवान अंजनेयही तेथेच राहिले.

येथे भगवान नरसिंह शाळिग्राम आणणारी अंजनेय मूर्ती १८ फूट उंच आहे आणि तिच्या हातात जपमाळ अन् कमरेत तलवार आहे.

येथेच श्री नरसिंह स्वामींच्या रूपात भगवान श्रीविष्णूची एक सुंदर ‘स्वयं उद्धव’ (नैसर्गिकरित्या बनलेली) मूर्ती आहे. प्राचीन गुहा मंदिर हे एका भव्य टेकडीवर कोरलेले आहे. देवी नामगिरी लक्ष्मीचे एक वेगळे मंदिर आहे. नामगिरी लक्ष्मी ही प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन् यांची कुलदेवी होती. रामानुजन् यांनी त्यांच्या बुद्धीमत्तेचे श्रेय त्यांची कुलदेवी असलेल्या नामक्कलच्या श्री महालक्ष्मीला दिले होते. रामानुजन् यांना त्यांच्या गणितातील कार्याची प्रेरणा त्यांच्या कुलदेवीकडूनच मिळाली. रामानुजन् यांना स्वप्नात रक्त दिसले, ज्यात त्यांना जटील गणितीय सूत्रे लिहिणारा हात दिसला. स्वप्नातून जागे झाल्यावर लगेचच त्यांनी ती सर्व गणितीय सूत्रे लिहून काढली. ते अनेकदा म्हणायचे, ‘‘माझ्यासाठी समीकरणाला काही अर्थ नाही, जोपर्यंत ते देवाच्या विचाराचे प्रतिनिधित्व करत नाहीत.’’ प्रसिद्ध संत श्री पुरंदरदास यांनीही या मंदिरात ‘सिंह रूपनाद श्री हरि नामगिरीषने’ हे गीत रचले.