बलुचिस्तान अटल बिहारी वाजपेयी यांना विसरू शकत नाही ! – Mir Yar Baloch

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व बलुची नेते मीर यार

क्वेटा (बलुचिस्तान) – बलुचिस्तान प्रांतातील स्वायत्ततावादी नेते मीर यार बलूच यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मरण केले आहे.

वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबरला त्यांना श्रद्धांजली वहातांना मीर यार यांनी म्हटले की, ते एक विलक्षण नेते होते. बलुचिस्तानमधील लोक अटल बिहारी वाजपेयी यांना स्मरतात आणि त्यांच्या कार्याचा आदर करतात. अटल बिहारी वाजपेयी हे भारतातील प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. सुमारे ५ दशके ते सक्रीय राजकारणात राहिले. ते १९९६ ते २००४ या कालावधीत ३ वेळा भारताचे पंतप्रधान होते. वर्ष २०१५ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला.

मीर यार यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की,

१. अटल बिहारी वाजपेयी एक आदर्श राजकारणी होते, ज्यांचे आयुष्य प्रामाणिकपणा, शिस्त आणि देशनिष्ठा यांवर आधारलेले होते.

२. वाजपेयी सत्य बोलत आणि प्रामाणिकपणे कार्य करत. ते कवी मनाचे असल्याने त्यांनी  राजकारणात एकप्रकारचे सौंदर्य होते. मित्र आणि विरोधक या दोघांसोबत समानतेने काम करण्याची त्यांची क्षमता त्यांना सार्वजनिक जीवनातील अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्त्व बनवते. त्यांचा सन्मान केवळ सत्तेसाठी नव्हे, तर चारित्र्य, नम्रता आणि नैतिकता यासाठी केला जात असे.

३. बलुची लोक वाजपेयी यांचा आदर करतात. महान नेते प्रत्यक्षात कधीही काळाच्या पडद्याआड जात नाहीत. त्यांच्या मूल्यांमुळे पुढील पिढ्यांना मार्गदर्शन मिळत रहाते.