काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावल्यानेच देशात हिंदू-मुसलमान समस्या ! – Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी देहली – देशात आजही हिंदू आणि मुसलमान संबंधित ज्या समस्या दिसतात, त्यांची कारणे काँग्रेसची धर्मनिरपेक्षतेची विचारसरणी आणि मतपेढी यांचे राजकारण आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावला. धर्मनिरपेक्षता म्हणजे एखाद्या विशिष्ट वर्गाचे लांगूलचालन करणे नव्हे. याचा खरा अर्थ ‘सर्वधर्मसमभाव’ असा होतो, म्हणजेच सर्व धर्मांना समान आदर देणे, सर्वांना न्याय देणे आणि सर्वांशी समानतेने वागणे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेवर टीका केली. ते येथे राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष प्रा. वासुदेव देवनानी यांच्या ‘सनातन संस्कृतीची अटल दृष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. या वेळी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन्ही उपस्थित होते.

इतिहासात कोणत्याही हिंदु राजाने धार्मिक स्थळे नष्ट केल्याचे उदाहरण नाही !

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, भारत आधीही सर्वधर्मसमभाव मानणारा होता, आजही आहे आणि नेहमीच राहील. हे भाजप-रा.स्व. संघ यांच्यामुळे नाही, तर भारतीय, हिंदु आणि सनातन संस्कृती यांमुळे आहे, जी जगाचे कल्याण शिकवते. भारतीय संस्कृती सहिष्णु, करुणामय आणि सर्वांना समवेत घेऊन चालणारी आहे आणि इतिहासात कोणत्याही हिंदु राजाने धार्मिक स्थळे नष्ट केल्याचे उदाहरण मिळत नाही.

आधुनिकीकरण हे अंध अनुकरणावर आधारित नसावे !

देहलीत झालेल्या अन्य एका कार्यक्रमात बोलतांना नितीन गडकरी म्हणाले की, ‘नेशन फर्स्ट’ (राष्ट्र प्रथम) ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित नसावी, तर त्यासाठी देशाचा इतिहास प्रामाणिकपणे समजून घेणे, व्यवस्थेतील त्रुटी ओळखणे आणि भविष्यात स्वतःच्या क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिकीकरण हे अंध अनुकरणावर आधारित नसावे, तर ते सांस्कृतिक आत्मविश्वासावर आधारित असावे.

ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर यांच्या ‘माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट : रिडिफाइनिंग अनएलॉयड नेशनलिझम्’ (माझ्या दृष्टीने ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना : निष्कलंक राष्ट्रवादाची नव्याने मांडणी) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात गडकरी बोलत होते. या वेळी भाजपचे प्रवक्ते आणि खासदार असणारे सुधांशु त्रिवेदी आणि लेफ्टनंट जनरल व्ही.जी. खंडारे (निवृत्त) हेही उपस्थित होते.