अवैधरित्या हस्तांतर केलेल्या भूमी मूळ आदिवासी कुटुंबांना परत कराव्या लागणार !

अक्कलकुवा (नंदूरबार) येथील तहसीलदार न्यायालयाचा ‘जामिया इस्लामिया’ शिक्षण संस्थेला आदेश !

‘जामिया इस्लामिया’ शिक्षण संस्था

अक्कलकुवा (नंदुरबार) – येथील तहसीलदार न्यायालयाने मूळ आदिवासी कुटुंबियांना भूमी परत करण्याचा निर्णय ‘जामिया इस्लामिया ईशातूल उलूम ट्रस्ट’ या शिक्षण संस्थेला दिला आहे. शिक्षण संस्थेने आदिवासींकडून अवैधरित्या भूमी हस्तांतर केल्या होत्या. या संस्थेत येमेन देशातील एका कुटुंबाला अवैध वास्तव्यामुळे अटक करण्यात आली असून संस्था चालकांवरही गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्या कुटुंबाने अक्कलकुवा येथून भारत सरकारचे रहिवासी असल्याचे शासकीय दस्ताऐवज सिद्ध करून दिले होते. या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) तेथे धाडी घातल्या होत्या. अधिवक्ता सुनील वसावे यांनी अक्कलकुवा तहसीलदारांकडे मौजे पिंपरीपाडा येथील शेतभूमीसाठी अर्ज प्रविष्ट केला होता.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात जामिया इस्लामिया ईशातूल उलूम ट्रस्टला छत्रपती संभाजीनगर येथील महसूल न्यायाधिकरणाकडे अपील करण्याचा अधिकार आहे. संबंधित संस्थेचे प्रमुख गुलाम वस्तानवी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. या भूमी प्रकरणात आदिवासी बांधवांच्या बाजूने लागलेल्या निकालानंतर जामिया संस्थेने अशा पद्धतीने आणखी काही भूमी घेतल्याचे समोर येत आहे.

संपादकीय भूमिका

केवळ भूमी हस्तांतर नको, तर हा प्रकार करणार्‍या संस्थेतील संबंधितांवर कठोर कारवाईही व्हायला हवी !