‘सनबर्न फेस्टिव्हल’ला वसईकरांचा वाढता विरोध !

पाचू बंदर (वसई) येथे नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या बैठकीत उपस्थित नागरिक

वसई – मुंबईत १९ ते २१ डिसेंबर या दिवशी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा वादग्रस्त पाश्चात्त्य संगीताचा कार्यक्रम होणार आहे. अमली पदार्थ, अश्लीलता, युवकांचे मृत्यू आणि सरकारचे कर बुडवलेला हा कार्यक्रम युवकांना नशेच्या आहारी घालणारा आहे. नशेमुळे युवकांची, त्यांच्या कुटुंबाची आणि पर्यायाने देशाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला नेहमीच विरोध होत आला आहे. मुंबईत होत असलेल्या या कार्यक्रमाला मुंबईला लागून असलेल्या वसईतून प्रचंड विरोध होत आहे.

७ डिसेंबर या दिवशी वसई गावातील पाचू बंदर येथे स्थानिकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने येथे एक बैठक घेतली गेली. या वेळी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना या कार्यक्रमाचे समाजावर होणारे घातक परिणाम अवगत केले आणि प्रबोधन करणारी पत्रके वाटली. अभियानाच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी या वेळी नागरिकांना मार्गदर्शन केले.

धर्मप्रेमी सर्वश्री सुनील तांदळेकर, अविनाश चावंडे, प्रशांत पाटील आणि विलास निकम यांसह ३० स्थानिक नागरिक उपस्थित होते. ‘युवकांना नशेच्या आहारी घालणारा कार्यक्रम रहित झाला पाहिजे’, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी या वेळी व्यक्त केली.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ तात्काळ बंद करा ! – वसईत आंदोलकांची मागणी

वसई-विरार महानगपालिका कार्यालयासमोर ८ डिसेंबर या दिवशी ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून विरोध केला. ‘आमची संस्कृती आणि युवा शक्ती नष्ट करू पहाणारा हा कार्यक्रम तात्काळ रहित करा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दिवाणेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त

पंडित जगदीशशास्त्री यांनी या वेळी मार्गदर्शन केले. ‘पालक आणि नागरिक यांनी त्यांच्या मुलांचे भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमाला विरोध केला पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी राष्ट्रप्रेमी सर्वश्री बापू परब, बी.एन्. श्रीवास्तव, अतुल मेहता आणि स्थानिक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.