(म्हणे) ‘कुंभमेळ्यासाठी १४ सहस्र कोटी आहेत; पण मुलांच्या शिक्षणासाठी २ सहस्र कोटी नाहीत !’

वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची कुंभमेळ्यावर टीका !

पत्रकार निरंजन टकले

नाशिक – कुंभमेळ्यासाठी १४ सहस्र कोटी रुपये आहेत; पण मुलांच्या शिक्षणासाठी २ सहस्र कोटी रुपये नाहीत. साधूग्राम वसवण्यासाठी झाडे कापणार आहेत, अशी उपरोधिक टीका वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केली आहे. (साधूग्रामची जागा ही अनेक वर्षांपासूनची आहे आणि त्या पडीक परिसरावर आता देशी अन् विदेशी वृक्ष आहेत. काही विदेशी वृक्षांमुळे भूमीची धूपही थांबत नाही, त्यावर पक्षी घरटीही करत नाहीत; उलट ते अधिक पाणी वापरतात. असे विदेशी वृक्ष काढणार, असे प्रशासनाने सांगितले आहे. प्रत्येक कुंभमेळ्याला हे केले जाते ! – संपादक)

टकले यांनी एका व्हिडिओत असेही म्हटले, ‘‘नाशिकमध्ये कुंभमेळ्यात ५-१० टन गांजा येतो. सर्व गांजा पिणारे येतात. त्या वेळी १० दिवस घराच्या बाहेर पडू शकत नाही, अशी स्थिती असते. येथील स्थानिक दुकानदार, उपाहारगृहांचे मालक यांना दुकाने बंद ठेवावी लागतात. पूर्ण शहर घाण होते. ६ कोटी लोक शहरात येणार, हे नाशिक शहर पेलवू शकत नाही. नाशिकमध्ये तेवढी सुलभ शौचालयेही नाहीत.’’ (उत्तरप्रदेशामध्ये फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या महाकुंभमध्ये चांगल्या पद्धतीने स्वच्छता राखली गेली होती. त्याच धर्तीवर येथे नियोजन झाले, तर येथेही स्वच्छता राखली जाईल ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • सरकारने विविध क्षेत्रांसाठी वेगवेगळे निधीवाटप केले आहे. शिक्षणक्षेत्रासाठी निधीची आवश्यकता असेल, तर तशी अभ्यासपूर्ण मागणी टकले करू शकतात; पण कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्वाला सरकारने दिलेले पैसे त्यांच्या डोळ्यांत का खुपत आहेत ? एकीकडे ‘कोट्यवधी लोक येणार, तर त्यांच्यासाठी सुविधा नाहीत’, असे टकले म्हणत आहेत. तर त्या सर्व सुविधा करण्यासाठी मोठा निधी लागणार नाही का ?
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व असतांना, त्यातून आध्यात्मिकच नव्हे, तर आर्थिक उन्नतीही होत असतांना कथित पर्यावरणवाद्यांना त्याचा त्रास का होतो ?