|

सावंतवाडी – तालुक्यातील डिंगणे गावातील देवस्थानांच्या भूमीची चौकशी आणि सर्वेक्षण करण्यासाठी २४ नोव्हेंबर या दिवशी आलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकार्यांना स्थानिकांनी विरोध केला. याविषयी समजल्यावर येथील फळबागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांनी, ‘सावंतवाडी देवस्थान समन्वय समितीने या प्रकरणावर आधीच गांभीर्याने पाठपुरावा केलेला आहे, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघही या सूत्रावर सक्रीय झाला आहे. याविषयी मंत्री आशिष जयस्वाल यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना दोन्ही जिल्हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रातून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत’, असे सांगून या आदेशाची प्रत व्हॉट्सॲपवर संबंधित अधिकार्यांना दाखवली. त्यानंतर अधिकार्यांनी काढता पाय घेतला.
याविषयीचा घटनाक्रम
१. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी दीपक जाधव आणि प्रमोद गवस हे सर्वेक्षणासाठी डिंगणे येथे आले होते. अधिकार्यांनी देवस्थानांच्या भूमी असलेल्या काही बागायतदारांना भेटून त्यांच्या बागायतींची छायाचित्र काढण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप स्थानिकांनी केला आणि त्यांना सर्वेक्षण बंद करण्यास भाग पाडले.
२. काही बागायतदारांनी फळबागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली आणि अधिकार्यांना सावंत यांच्या निवासस्थानी आणले.
३. सावंत यांनी अधिकार्यांना सांगितले की, पूर्वी राजे आणि संस्थाने यांनी मंदिरांचा कारभार चालवला आणि त्यांनी मानकरी अन् सेवेकरी यांच्या उपजीविकेसाठी देवस्थानांच्या भूमी त्यांना दिलेल्या आहेत. या भूमीशी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा दुरान्वयानेही संबंध नाही. याविषयी मंत्र्यांचा आदेश जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाला असून त्यांनी तहसीलदारांनाही कळवले आहे. अशा परिस्थितीत बलपूर्वक सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा उद्रेक होऊ शकतो आणि कर्मचार्यांना फिरणेही अवघड होईल.
४. या घटनेनंतर सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, देवस्थानच्या भूमीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची कोणतीही पथके गावात आली, तरी सर्व मानकरी आणि भूमीधारक यांनी कडाडून विरोध करावा.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली