श्रीकृष्ण जन्मभूमीसह देशातील सर्व मंदिरे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी हिंदूंनी सिद्ध व्हावे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास’ आयोजित सभा !

डावीकडून पं. दिनेश फलाहारी महाराज, श्री. राजेंद्र सावंत, डॉ. उपेंद्र डहाके आणि बोलतांना श्री. सतीश कोचरेकर

मुंबई – कौरवांनी पांडवांसाठी ५ गावेही न दिल्याने महाभारत घडले. हिंदू शिष्टाई करत असूनही धर्मांध लोक मंदिरे द्यायला सिद्ध नाहीत. त्यामुळे केवळ श्रीकृष्ण जन्मभूमीच नव्हे, तर अतिक्रमण झालेली देशातील लाखो मंदिरे हिंदूंनी पुन्हा प्राप्त करायला हवीत. त्यासाठी हिंदूंनी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या वतीने वरळी येथील जांभोरी मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय अध्यक्ष पं. दिनेश फलाहारी महाराज, आंतरराष्ट्रीय प्रचारक प्रियाकिशोरी भारद्वाज, राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री डॉ. उपेंद्र डहाके आणि ‘रायगड संवर्धन प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. राजेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. सतीश कोचरेकर पुढे म्हणाले, ‘‘मदन मोहन मालवीय हे श्रीकृष्ण जन्मभूमीस्थळी मंदिर बांधण्यासाठी प्रयत्नरत होते; मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने ते होऊ दिले नाही, हा इतिहास हिदूंना ठाऊक असायला हवा. श्रीरामजन्मभूमीसाठी ५०० वर्षे संघर्ष करावा लागला. त्याप्रमाणे अन्य मंदिरांसाठीही हिंदूंना संघर्ष करावा लागेल.’’

हिंदूंनी जातीभेद आणि प्रांतभेद बाजूला ठेवून संघटित व्हावे ! – राजेंद्र सावंत, अध्यक्ष, रायगड संवर्धन प्रतिष्ठान

श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी हिंदूंनी जातीभेद आणि प्रांतभेद बाजूला ठेवून संघटित व्हावे. या महान कार्यासाठी भगवंत आपल्याला शक्ती देईल. त्यासाठी श्री नारायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्णजन्मभूमी प्राप्त करण्यासाठी हिंदूंनी सिद्ध व्हावे.
याप्रसंगी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री डॉ. उपेंद्र डहाके आणि राष्ट्रीय संघटन महामंत्री श्री. शंकर वराडकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.