बच्चू कडू यांचे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह २२ मागण्यांसाठी आंदोलन !

नागूपर – प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकर्‍याच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन चालू केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने बच्चू कडू यांना आंदोलनस्थळावरून बाजूला होण्याचे आदेश देऊनही ते बराच वेळ बाजूला झाले नव्हते. ४ महामार्ग रोखून प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी केल्यानंतर रात्री सव्वासातनंतर अंतिमतः पोलिसांनी आंदोलकांना दिलेल्या ठिकाणी परत गेले. सहस्रो शेतकर्‍यानां घेऊन त्यांनी ‘भले कर्जमाफी नंतर करा; पण त्याचा जीआर तरी आज काढा’ ही मागणी घेऊन चक्का जाम आंदोलन चालू केले आहे. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव, उसाची एफ्.आर्.पी, दुधाचे दर आणि सातबारा कोरा करणे यासह शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ आणि दिव्यांगांच्या एकूण २२ मागण्यांसाठी हे आंदोलन चालू केले आहे. २८ ऑक्टोबरपासून हे आंदोलन चालू आहे.

  • आंदोलकांनी नागूपर-मुंबई समृद्धी महामार्ग रोखला ! 
  • २ दिवस नागपूरमध्ये आंदोलन चालू
  • सरकारशी चर्चा झाली ! 
  • नागपूर खंडपिठाच्या आदेशानंतरही बराच वेळ आंदोलन चालू !

या आंदोलनाला काही काळ हिंसक वळण लागले. नागपूरच्या महामार्गांवर मोठी वाहतूककोंडी झाली. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले. आंदोलकांनी गेले २ दिवस नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग रोखला आहे. त्यामुळे अनेक रुग्ण, नागरिक यांची गैरसोय झाली. वाहतूक विस्कळीत झाली.

माध्यमांशी बोलतांना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बैठक लावून दीड घंटा वाट पाहिली; परंतु ते बैठकीला आलेच नाहीत. बैठकीतच मार्ग निघतो. मुख्यमंत्र्यांनी बैठकीला कुणी अन्य प्रतिनिधी आलेत का ? हे वारंवार विचारले, असे यांनी सांगितले. सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली.

परसोडी गावाजवळच्या मैदानावरील आंदोलनाची अनुमती देण्यात आली आहे.

या वेळी बच्चू कडू म्हणाले की, आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातला हा संघर्ष आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही. मात्र ‘लोक न्यायालया’चे ऐकणे  सोडणार नाही.