म्हसवड (जिल्हा सातारा) येथे माणगंगा नदीला पूर !

दुकानदारांची कोट्यवधी रुपयांची हानी

सातारा, २८ सप्टेंबर (वार्ता.) – गत काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. माण तालुक्यामध्ये २७ सप्टेंबर या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने मानगंगा नदीला पूर आला. म्हसवड शहरात पुराचे पाणी शिरल्यामुळे दुकानदारांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. खरीप हंगाम आधीच वाया गेला असतांना परतीच्या पावसामुळे उरलेसुरले पीक हातचे जाण्याच्या शक्यतेने शेतकरी पुन्हा धास्तावला आहे.

जिल्ह्यातील ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे; मात्र बहुतांश पिके वाया गेल्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक अतिवृष्टीमुळे हानी झाल्याने राज्य सरकार शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी चर्चा करून बाधित भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.