आडाळी औद्योगिक क्षेत्राची शेकडो एकर भूमी कवडीमोलाने पर्यटन प्रकल्पासाठी देण्याचा घाट !

आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचा आरोप

आडाळी औद्योगिक क्षेत्राचा फलक

दोडामार्ग – स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट), पर्यटन आणि गोल्फ (एक खेळ) यांच्याशी संबंधित प्रकल्पांसाठी तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्राची ७०० पैकी ५०० हून अधिक एकर पायाभूत सुविधांनी विकसित केलेली भूमी कवडीमोल भावाने एका पर्यटन आस्थापनाला देण्याचा प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नांना आमचा विरोध आहे. येथे उद्योग चालू करू इच्छिणार्‍या उद्योजकांसाठी भूखंड देण्याची ‘ऑनलाईन प्रक्रिया’ २२ सप्टेंबरला अचानक रहित करण्यात आली आहे. ही ऑनलाईन भूखंड वाटप प्रक्रिया २ ऑक्टोबरपर्यंत चालू न केल्यास आमरण उपोषण करण्याची चेतावणी सरपंच तथा आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष पराग गावकर आणि सचिव प्रवीण गावकर यांनी दिली आहे.

याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की…

१. ज्या प्रकल्पासाठी हे प्रयत्न चालू आहेत, त्यापेक्षा लहान आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आल्यास त्यातून कुशल -अकुशल स्वरूपाच्या सहस्रो नोकर्‍यांची संधी निर्माण होऊ शकतात. अनेक लहान उद्योग चालू झाल्यास त्यातील बहुतांश उद्योग पुढे चालू रहातील.

२. एकाच पर्यटन प्रकल्पाला भूमी देण्याच्या महामंडळाच्या भूमिकेला आमचा विरोध राहील. त्याऐवजी महामंडळाने अचानक रहित केलेली भूखंड वाटप प्रक्रिया तात्काळ चालू करावी. ज्या उद्योजकांनी भूखंड घेतले आहेत, त्यांची अन्य प्रक्रिया गतीमान करावी.

३. तिलारी खोर्‍यातील स्थानिक तिलारी धरण परिसरात पर्यटन प्रकल्प यावा म्हणून संघर्ष करत आहेत. येथील स्थानिक तरुणांनी गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी मागणी केली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आडाळीत उद्योग आणि तिलारी येथे पर्यटन प्रकल्प झाल्यास तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.