आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१९.९.२०२५)

सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून २ जण घायाळ !

ठाणे – येथील वागळे इस्टेट भागातील साई ममता या इमारतीमधील दुसर्‍या मजल्यावरील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून २ जण किरकोळ घायाळ झाले आहेत. १७ सप्टेंबरच्या सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.


गणेशोत्सवात ६ लाख कोकणवासियांनी केला एस्.टी.ने प्रवास !

मुंबई – गणेशोत्सवाच्या काळात २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे आणि पालघर भागांतून ५ लाख ९६ सहस्रांहून अधिक कोकणवासियांनी प्रवास केला. यामुळे एस्.टी. महामंडळाला २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

यावर्षी गणेशोत्सवाकरता कोकणात जाण्यासाठी ५ सहस्रांहून अधिक बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. १५ सहस्र ३८८ फेर्‍या सोडण्यात आल्या. हा सर्व प्रवास अपघात विरहित आणि सुरक्षितरित्या झाला. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एस्.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि  कर्मचारी यांनी मोठे कष्ट घेतले. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी महामंडळाचे वाहनदुरुस्ती पथक ठेवण्यात आली होती. बस नादुरुस्त झाल्यास चिपळूण, महाड आणि माणगाव आगारात १०० अधिक बसगाड्या ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती प्रतास सरनाईक यांनी दिली.


वाहन खरेदीसाठी मंत्री, शासकीय अधिकारी यांना रक्कमेची मर्यादा

मुंबई, १८ सप्टेंबर (वार्ता.) – मंत्री, शासकीय अधिकारी आणि घटनात्मक पदांवरील महनीय व्यक्ती यांना वाहन खरेदीसाठी सरकारने रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि लोकायुक्त यांना वगळण्यात आले असून त्यांना वाहन खरेदीसाठी रकमेची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

राज्याचे मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासाठी ३० लाख रुपये इतकी वाहन खरेदीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महाधिवक्ता, मुख्य माहिती आयुक्त, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्य निवडणूक आयुक्त, अपर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव आदींना २५ लाख रुपयांपर्यंत मर्यादा देण्यात आली आहे. राज्य माहिती आयुक्त, लोकसेवा आयोगाचे सदस्य आदींना २० लाख रुपये, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांना १५ लाख रुपये इतक्या रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.


जिल्हाधिकार्‍यांची २ मुले जिल्हा परिषद शाळेत शिकणार !

अभिनंदनीय निर्णय !

नंदुरबार – येथील जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील जिल्हा परिषद शाळेत घातले आहे. या शाळेत मराठी, आदिवासी आणि अहिराणी समाजातील विद्यार्थी आहेत. या निर्णयामुळे शासकीय शाळांविषयी जनतेत विश्वास वाढेल, तसेच इतर पालकांनाही आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवण्याची प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.


शिवतीर्थावर राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सातारा, १८ सप्टेंबर (वार्ता.) – दादर येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. विटंबना करण्याचे भ्याड कृत्य एका समाजकंटकाकडून झाले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे..