कुंभोज (जिल्हा कोल्हापूर) येथील आठवडी बाजार भरवण्यासाठी आमरण उपोषण !

कुंभोज (जिल्हा कोल्हापूर) – येथील गट क्रमांक १९०३ या मिळकतीमधील एकूण क्षेत्रातील ०.८२ आर् भूमी पूर्वीपासून पडीक आणि खुली अशा अवस्थेत आहे. उर्वरित जागेत गावतलाव आहे. ही भूमी ग्रामपंचायतीच्या मालकीची असून ती तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने वर्ष १९५५ मध्ये ग्रामपंचायतीस मिळाली आहे. मध्यंतरी एका अल्पसंख्य समुदायाने या भूमीवर प्रविष्ट केलला दावा न्यायालयातून मागे घेतला. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी परत या भूमीवर बाजार भरवण्याचे आदेश दिले. यानंतर स्थानिक प्रशासन यावर कोणतीच कारवाई करत नसून येथे परत आठवडी बाजार मिळण्यास अनुमती मिळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी आमरण उपोषण प्रारंभ केले आहे.

या संदर्भात देवमोरे म्हणाले, ‘‘३ दिवसांपासून मी उपोषण करत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिल्यानंतरही फेब्रवारी २०२५ पासून भूमीच्या मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही, तसेच आमच्या आवेदनाची नोंद घेतलेली नाही. त्यामुळे गट क्रमांक १९०३ शेजारी असलेल्या भूमीशेजारी मी आमरण उपोषण करत आहे.’’ या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी १७ सप्टेंबरला कुंभोज गावबंद ठेवण्यात आले होते.