Karnataka Dharmasthala : धर्मस्थळ तीर्थक्षेत्राच्या अपप्रचाराच्या विरोधात कारवाई करणार !

  • कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे विधान

  • तीर्थक्षेत्राच्या भूमीत अनेक प्रेतं पुरल्याचे आरोप केल्याचे प्रकरण

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

बेंगळुरू / उडुपी (कर्नाटक) – धर्मस्थळ तीर्थक्षेत्राच्या प्रकरणात अपप्रचार करणार्‍यांवर कारवाई करण्याचा सरकार विचार करत आहे, असे विधान उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

धर्मस्थळाच्या अपकीर्तीचा कट !

शिवकुमार पुढे म्हणाले की, धर्मस्थळाप्रतीची भक्ती आणि श्रद्धा यांविषयीच्या प्रक्रियांबद्दल मला विश्‍वास आहे. हा धर्मस्थळाच्या बाजूने किंवा विरोधातील विषय नाही. सगळ्या प्रक्रिया न्यायपूर्ण पद्धतीने व्हायला हव्यात. धर्मस्थळाला मी खूप जवळून पाहिले आहे. धर्मस्थळाच्या विषयात काही कट रचला गेला आहे का ? यासंदर्भात गृहमंत्री जी. परमेश्‍वर विधानसभेच्या अधिवेशनात उत्तर देऊन राज्याच्या जनतेसमोर सत्य मांडतील.

‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही या विषयाबद्दल बांधिलकी आहे. कुणीही खोटे बोलून, कट रचून अपमान किंवा अपप्रचार करू नये. असे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले आहे. खोटे आरोप केले असतील, तर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. आपण त्याचे रक्षण करायला हवे. इथे कुणालाही संरक्षण दिले जाणार नाही. तसेच विनाकारण कुणाची अपकीर्तीही करू नये, असेही उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले.

डी.के. शिवकुमार यांच्या वक्तव्याशी मी सहमत ! – महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

आम्ही सगळेच धर्मस्थळ मंजुनाथाचे भक्त आहोत. धर्मस्थळाच्या अपकीर्तीचा कट रचण्यात आल्याच्या डी.के. शिवकुमार यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. धर्मस्थळाच्या संदर्भात राजकारण करणे योग्य नाही. अन्वेषणातूनच सत्य बाहेर येईल, असे राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले.

मंजुनाथाच्या मूर्तीखाली प्रेत पुरले आहे, असे म्हटल्यावर तिथेही खोदणार का ? – आमदार यत्नाळ यांचा प्रश्‍न

धर्मस्थळच्या विरोधात कट रचला जात आहे. २० फूट खोल खोदल्यावरही काहीच मिळत नाही. २० फूट आत कुणी प्रेत टाकू शकेल का ? त्यामुळे हा धर्मस्थळ आणि धर्माधिकारी यांंचे नाव अपकीर्त करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप आमदार बसवनगौडा यत्नाळ यांनी केला.

आमदार रत्नाळ पुढे म्हणाले की, तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये गोमांसाचे  घटक आणि अय्यप्पा स्वामी मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करणे, ही काँग्रेसची हिंदुविरोधी वृत्ती आहे. मंजुनाथाचे प्रकरणही त्याचाच एक भाग आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्याच्या सांगण्यावरून सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली आहे. त्यामुळे मी सिद्धरामय्या यांच्याशी बोललो आहे. ‘३० ठिकाणी प्रेतं पुरली आहेत’, असे ते म्हणत आहेत. उद्या ‘मंजुनाथ देवाच्या मूर्तीच्या खालीही प्रेत पुरण्यात आले आहे’, असे म्हटल्यावर तिथेही खोदणार का ? असा प्रश्‍न विचारून आमदार यत्नाळ यांनी विशेष अन्वेषण पथकाच्या स्थापनेवर टीका केली.

काय आहे प्रकरण ?

जुलै २०२५ मध्ये एक अज्ञात व्यक्ती, जी पूर्वी धर्मस्थळ मंदिरात स्वच्छतेच्या  कामात सहभागी होती, तिने दावा केला की, तिच्यावर वर्ष १९९५ ते २०१४ या काळात येथील भूमीत मृतदेह पुरण्याचा दबाव आणला गेला. महिला आणि मुली यांचे मृतदेहही येथे पुरण्यात आले, असा दावा तिने केला. या दाव्यानंतर सरकारने विशेष अन्वेषण पथक  स्थापन करून चौकशी चालू केली. १३ ठिकाणी खोदकाम करण्यात आले; मात्र कुठेही काहीच सापडले नाही. त्यामुळे खोदकाम थांबवण्यात आले आहे.

काय आहे धर्मस्थळ ?

धर्मस्थळ हे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक प्राचीन जैन-हिंदु तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री मंजुनाथेश्‍वर (शिव) देवाची पूजा होते. मंदिराचे धार्मिक व्यवस्थापन जैन धर्मगुरु धर्माधिकारी डॉ. वीरेंद्र हेगडे यांच्या अधिपत्याखाली आहे. येथे शिवपूजा होत असली, तरी व्यवस्थापन जैन घराण्याकडे आहे. त्यामुळे हे स्थळ जैन-हिंदु एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. धर्मस्थळ हे केवळ धार्मिक केंद्र नाही, तर येथे शिक्षण, आरोग्य, अन्नदान, ग्रामीण विकास यांसाठी मोठ्या प्रमाणात सेवाकार्य चालते. अन्नछत्रात प्रतिदिन सहस्रो भाविकांना विनामूल्य भोजन दिले जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालू आहे. दक्षिण भारतातील लाखो भाविक येथे येतात. विशेषतः अन्नदान आणि समाजसेवा यांमुळे धर्मस्थळाला विशेष स्थान आहे.