राज्यात दहीहंडी उत्साहात !

जोगेश्वरीच्या कोकणनगर गोविंदा पथकाने लावलेले १० थर…

मुंबई – मुंबईसह राज्यात १६ ऑगस्ट या दिवशी गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्यभरात विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांत दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत लोअर परळ, घाटकोपर, वरळी आणि ठाणे या ठिकाणी विविध प्रतिष्ठानांकडून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीसाठी लाखो रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. जोगेश्वरीच्या कोकणनगर गोविंदा पथकाने यंदा १० मानवी मनोरे रचत विश्वविक्रम केला आहे. या पथकाने ‘जय जवान गोविंदा पथका’चा विक्रम मोडीत काढला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हा विक्रम घडला. मंत्री सरनाईक यांनी कोकणनगर गोविंदा पथकाला अनुमाने २५ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील जंगल मंगल रस्त्यावरील दहीहंडी स्वतः ४ थर चढत फोडली. एका ठिकाणी सातव्या थरावरून पडून एका गोविंदाचा मअत्यू झाल्याचे समजते.

भाजपचे नेते आशिष शेलार आणि संतोष पांडे यांच्या परिवर्तन इंडिया फाउंडेशनने वरळी येथे दहीहंडी आयोजित केली आहे. या ठिकाणी उंच मानवी मनोर्‍यावर ‘छावा’ चित्रपटातील दृश्य उभे करण्यात आले होते.

नागपूर येथे बडकस चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दादर येथील महिला गोविंदांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली . कल्याण-डोंबिवली येथे खासगी २७५ आणि सार्वजनिक ५० मिळून एकूण ३२५ दहीहंड्या फोडण्यात आल्या. उत्साहात कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. राज्य राखीव दलाची तुकडी, २२ पोलीस निरीक्षक, ७१ अधिकारी आणि ६०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.