भारत कधीच ‘हिंदु राष्ट्र’ किंवा ‘इस्लामी राष्ट्र’ होणार नाही ! – Maulana Shahabuddin Razvi Bareilvi

पाटलीपुत्र (बिहार) येथील सनातन महाकुंभामध्ये पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री आणि स्वामी रामभद्राचार्य यांच्या हिंदु राष्ट्राच्या घोषणेचे प्रकरण

मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी व पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

बरेली (उत्तरप्रदेश) – भारत हा लोकशाही देश आहे. भारत ना ‘भगवा ए हिंद’ बनेल, ना ‘गजवा ए हिंद’ (काफिरांवर विजय प्राप्त करून त्यांचे इस्लामीकरण करण्यासाठीचे युद्ध ) बनेल. भारत कधीच ‘हिंदु राष्ट्र’ किंवा ‘इस्लामी राष्ट्र’ होणार नाही, भारत हा लोकशाही देश आहे. या २ सूत्रांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे देशात समस्या निर्माण होऊ शकते आणि कट्टर विचारसरणीला प्रोत्साहन मिळू शकते, अशी प्रतिक्रिया ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी व्यक्त केली. बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथे आयोजित सनातन कुंभमेळ्यामध्ये पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री आणि स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी मार्गदर्शन करतांना हिंदु राष्ट्राची मागणी केली होती. त्यावर बरेलवी बोलत होते.

मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सांगितले की,

१. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री आणि स्वामी रामभद्राचार्य महाराज हे दोघेही हवामान आणि परिस्थिती यांनुसार वक्तव्य करतात. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अशा राजकीय वातावरणात या दोघांनी हिंदु राष्ट्र बनवण्याचे वक्तव्य केले आहे.

२. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले, ‘जर भारत हिंदु राष्ट्र बनणार असेल, तर त्याचा प्रारंभ बिहारमधूनच होईल.’ त्यांचे हे वक्तव्य पूर्णपणे निवडणुकीला लक्षात घेऊन दिले गेले आहे. या वक्तव्याचा उद्देश धार्मिक ध्रुवीकरण करणे, हिंदू आणि मुसलमान यांना परस्परांपासून विभक्त करणे, हे आहे. ही त्यांची रणनीती आहे, जेणेकरून निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाला लाभ होईल. हा त्यांचा ठरवून केलेला डाव आहे.

३. त्यांचे दुसरे विधान होते की, ‘भारतात जेव्हा ८० टक्के हिंदु लोकसंख्या होईल, तेव्हा भारत ‘भगवा ए हिंद’ घोषित केला जाईल’; पण त्यांना ठाऊक नाही की, भारत सरकारच्या आकडेवारीनुसार देशात सध्या १९ टक्के मुसलमान लोकसंख्या आहे आणि ८१ टक्के मुसलमानेतर लोकसंख्या आहे. त्यांनी ‘भगवा ए हिंद’ची घोषणा ‘गजवा ए हिंद’च्या प्रत्युत्तरात दिली आहे; पण भारतातील मुसलमानांनी आधीच ‘गजवा ए हिंद’ या घोषणेला नकार दिला आहे.

४.  हे दोघे कथावाचक असे वक्तव्य करत आहेत, ज्यामुळे देशातील कट्टर विचारधारेला बळ मिळू शकते. या दोघांच्या घोषणांमध्ये आणि इतर कट्टरतावाद्यांच्या घोषणांमध्ये काय फरक रहाणार ? अशा प्रकारच्या गोष्टींमुळे भारताची प्रतिमा वाईट होते आणि कट्टर विचारधारेचा प्रसार होतो.

संपादकीय भूमिका

  • देशातील असा एकही मौलाना (इस्लामचा अभ्यासक) नसेल, ज्याच्या मनात ‘भारत इस्लामी देश व्हावा’, अशी इच्छा नसेल; मात्र लोकांसमोर सांगतांना साळसुदपणाचा आव आणत इस्लामी देशाची मागणी नाकारतांना हिंदु राष्ट्रालाही विरोध करण्याची ही त्यांची धूर्त खेळी आहे, हे लक्षात घ्या !
  • ‘भारत इस्लामी राष्ट्र होणार नाही’, हे जितके सत्य आहे, तितकेच ‘भारत हिंदु राष्ट्र होणार’, हेही सत्य आहे !