सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) म्हणजे, ज्ञानाचा मेरूपर्वत आणि गुणांचा महासागर ! त्यांचे सहज आचरणही साधनेचे विविधांगी दृष्टीकोन देणारे असून त्यातून ‘योग्य आणि परिपूर्ण कृती कशी करावी ?’, हे कळते. गुरुदेव साधकांना ‘सहज बोलण्यातून; अभ्यासवर्ग, सत्संग आणि प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमांतून; पत्रलेखनातून; अभ्यास करण्यास उद्युक्त करून; तसेच साधकांना त्यांच्या चुका दाखवून’ शिकवतात. त्यांचे शिकवणे चैतन्याच्या स्तरावरील असल्यामुळे त्यांची शिकवण साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोचून ती सहजपणे साधकांच्या आचरणातही येते. गुरुदेवांच्या ‘अनमोल शिकवणी’चे २ ग्रंथ प्रकाशित झाले असून त्या ग्रंथांची मनोगते संपादित स्वरूपात पुढे दिली आहेत. गुरुदेवांची महान शिकवण आचरणात आणून शीघ्र गुरुकृपेस पात्र होण्यासाठी उपयुक्त असलेले हे २ ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवण्यासारखे आहेत !

ग्रंथाचे संकलक : हिंदु राष्ट्र-स्थापनेचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
‘अनमोल शिकवण’ मालिकेचे मनोगत
खंड १ : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती
ग्रंथाचे मृखपृष्ठ
‘समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात म्हटले आहे – ‘धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वरी अवतार ।।’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांनी सनातन संस्थेच्या स्थापनेपासून राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानाचा महायत्न मांडला आहे. धर्मसंस्थापनेच्या कार्यात त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. ५.५.२०१८ या दिवशी झालेल्या नाडीपट्टीवाचनात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे भगवान श्रीकृष्णाचेच अंशात्मक रूप असून ते धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठीच भूतलावर अवतरले आहेत !’, असा उल्लेख आहे. द्वापरयुगात श्रीकृष्णाची अमृतमय शिकवण गीतेच्या रूपात अवतरली. गीतेप्रमाणेच प्रासादिक, धर्मज्ञान देणारी आणि अखिल मानवांचा उद्धार करणारी अशी गुरुदेवांची शिकवण या कलियुगात प्रस्तुत ‘शिकवण’ ग्रंथमालिकेच्या रूपाने अवतरत आहे !
सर्वांगस्पर्शी शिकवण !

आजपर्यंत भारतवर्षात सहस्रो संत-महात्मे होऊन गेले. बहुतेकांनी प्रामुख्याने कोणत्या तरी एका साधनामार्गाची शिकवण दिली आहे. कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग या प्रचलित साधनामार्गांच्या जोडीलाच चित्रकला, मूर्तीकला, संगीत आदी कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीची शिकवण देणारे, तसेच संस्कृतीपालन, समाजकारण, राष्ट्रकारण, धर्मजागृती, धर्मसंस्थापना म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना, सूक्ष्म-जगत् अशा सर्व अंगांच्या संदर्भात शिकवण देणारे गुरुदेव हे बहुधा या कलियुगातील एकमेवच असतील !
साधनेविषयीची सुगम, प्रायोगिक अन् चैतन्यदायी शिकवण !
गुरुदेवांची शिकवण कळायला सोपी, जीवनातील लहानसहान उदाहरणांतूनही अध्यात्म शिकवणारी आणि कृतीच्या स्तरावर साधनेविषयी मार्गदर्शन करणारी असल्याने सहज आचरणात आणता येते. उच्च कोटीतील संतांचे हे मार्गदर्शन असल्यामुळे ते चैतन्यदायी आहे अन् म्हणूनच अंतर्मनावर साधनेचा संस्कार दृढ करून कृतीला उद्युक्त करणारेही आहे.
गुरूंच्या शिकवणीशी एकरूप व्हा !
गुरूंचे स्थूल रूप म्हणजे त्यांचा देह, तर सूक्ष्म रूप म्हणजे त्यांची शिकवण ! साधक गुरूंच्या स्थूल रूपाशी नव्हे, तर सूक्ष्म रूपाशी एकरूप होऊ शकतो. गुरूंच्या सूक्ष्म रूपाशी, म्हणजे शिकवणीशी एकरूप होता येण्यासाठी गुरूंनी दिलेली शिकवण सतत आचरणात आणणे महत्त्वाचे असते. गुरुदेवांची शिकवण अभ्यासतांना ती भावाच्या स्तरावर अंतःकरणातही साठवावी, म्हणजे आवश्यक त्या वेळी ती आठवून आचरणातही आणता येईल.’
– पू. संदीप आळशी (३.५.२०२३)
खंड २ : आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे
ग्रंथाचे मृखपृष्ठ
‘परीस लोखंडाला सुवर्णत्व देऊ शकतो; पण परीसत्व नाही. याउलट गुरु शिष्यावर कृपा करून त्याला स्वतःचे गुरुत्वच देतात ! गुरुकृपा होण्यासाठी गुरूंची शिकवण मात्र सतत आचरणात आणावी लागते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) या महान गुरूंची शिकवण आचरणात आणल्यामुळे अनेक साधक आध्यात्मिक प्रगती करत आहेत.
त्यामुळे त्यांच्या शिकवणीची उंची आणि खोली यांचा सहजासहजी थांग लागत नाही. ते शब्दांतून तर अध्यात्म शिकवतातच; पण त्यांचे नित्य सहज आचरणही साधनेचे विविधांगी दृष्टीकोन देणारे आणि इतके आदर्श आहे की, त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकच जण पुष्कळ काही शिकून जातो. आपण ‘शब्दांतून जे शिकतो’, त्यापेक्षा ‘कृतीतून जे शिकतो’, ते आपल्या अधिक स्मरणातही रहाते. या दृष्टीने या ग्रंथात दिलेले साधकांचे अनुभव मौलिक आहेत.
गुरुदेव सूक्ष्मातूनही साधकांना विविध प्रकारे कसे शिकवतात, हेही या ग्रंथात दिले आहे. हे वाचून ‘कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असली अन् गुरुदेव स्थुलातून आपल्या जवळ नसले, तरी ते सूक्ष्मातून आपल्या समवेत असून आपल्याला योग्य साधनेची दिशा देणारच आहेत’, ही साधकांची श्रद्धा वाढायलाही साहाय्य होईल.
गुरुदेवांच्या शिकवणीचे साधकांना झालेले विविध लाभही ग्रंथात दिले आहेत. गुरुदेवांकडून अनेक जण अनेक प्रकारे शिकले आहेत आणि शिकतही आहेत. काही साधकांनी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिली. त्या सूत्रांच्या आधारे हा ग्रंथ सिद्ध केला आहे. अनेक साधक वेळोवेळी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देतच असतात. त्यामुळे गुरुदेवांच्या शिकवणीच्या ग्रंथांच्या पुढे आवृत्त्यांवर आवृत्त्या निघणार आहेत.
‘गुरुदेवांची शिकवण सर्वांनी आचरणात आणून चांगली साधना करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घेतली, तर या ग्रंथाचे खर्या अर्थाने सार्थक होईल. असे लवकर होवाे’, ही श्री गुरुचरणी मनोभावे प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी (६.९.२०२३)
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
संपर्क : ९७६६२४९६९६
|