मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूककोंडी !

मुंबई – येथे ३ जून या दिवशी पडलेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, वांद्रे, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मीरा रोड आणि मरीन ड्राइव्ह परिसरात पुष्कळ पाऊस पडला. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने सकाळी ७.४० वाजता तेथील वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी तातडीने पाणी उपसल्याने ४५ मिनिटांनंतर वाहतूक पूर्ववत झाली.

बर्‍याच ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने अनेक प्रवाशांनी सामाजिक माध्यमांवर वाहतूक व्यवस्थापनाविषयी खेद व्यक्त केला. पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूर-वडाळा बोगद्याबाहेर पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून चारचाकी घसून ती कठड्याला धडकली. यामुळे काही काळ वाहतूक संथ झाली.