Pandit Dhirendra Shastri : बंगालमधील हिंदूंच्या पलायनाची स्थिती उद्या महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेशातही निर्माण होईल ! – पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

श्री बागेश्वर बालाजी सनातन मठाचा लोकार्पण सोहळा

पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

भिवंडी – हिंदुस्थानमध्ये रहाणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुसलमानविरोधी नाही. आज भयप्रद वातावरणामुळे बंगालमधून हिंदू पलायन करत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्येही असे होईल. पुढे मध्यप्रदेशात होईल. एका विशेष समुदायाकडून हिंदूंना घाबरवण्याचे प्रयत्न चालू आहेत, हे निंदनीय आहे. मुसलमान हे भारतातील कायद्यात राहिले, तर फायद्यात रहातील, असे श्री बागेश्वर धाम मठाचे मठाधिपती पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे. देशातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिला श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीतील हायवे दिवे येथे उभारण्यात आला. या मठाचा लोकार्पण सोहळा १४ एप्रिल या दिवशी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सर्वसाधारण गोरगरीब बागेश्वर बालाजीभक्तांना मध्यप्रदेशात जाणे शक्य होत नाही, अशा भक्तांसाठी भिवंडी येथील बागेश्वर बालाजी धाम ही पर्वणी आहे. हा मठ सनातन धर्मप्रसाराचे केंद्र आणि भक्तांसाठी आस्थेचे श्रद्धास्थान होणार आहे.’’

कसा आहे श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ ?

साडेचार एकर क्षेत्रफळात या मठाची रचना आहे. या ठिकाणी तळमजला अधिक एक मजला आहे. मंदिराच्या मागील बाजूस यज्ञशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर श्री बागेश्वर बालाजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून बालाजींच्या उजव्या बाजूला गणरायाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला शुभ्र स्फटिकाचे शिवलिंग आहे. बालाजींच्या मूर्तीच्या समोरच प्रभु श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि हनुमंत स्वारीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तळ मजल्यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांची बैठक व्यवस्था, तसेच छोट्या खाणी दिव्य दरबार सभागृह बनवण्यात आले आहे. येथे रामायणातील विविध प्रसंगाचे चित्रेही रेखाटण्यात आली आहेत.