श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कोणत्याही परिस्थितीत नदीतच करण्यावर सकल हिंदु समाज ठाम !

कोल्हापूर महापालिकेकडून पंचगंगा नदी परिसर ‘बॅरिकेड्स’ लावून बंद !

नदीवर एकत्र जमलेले हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – वर्षभर विविध मार्गांनी होणार्‍या जलप्रदूषणासाठी काही न करणार्‍या कोल्हापूर महापालिका प्रशासनाने गणेशभक्तांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करू नये; म्हणून पंचगंगा नदीचा परिसर लोखंडी ‘बॅरिकेड्स’ लावून बंद केला आहे. ही गोष्ट सकल हिंदु समाजाच्या हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर ते सर्व दुपारी १२ वाजता पंचगंगा नदीवर जमा झाले आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीतच करण्यावर ठाम असल्याचे सांगितले. सर्व गणेशभक्तांना उद्या दुपारी ३ वाजता पंचगंगा नदीच्या काठावर जमा होण्याचे आवाहन सकल हिंदु समाजाने केले आहे.

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजित पाटील, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, भाजपचे माजी नगरसेवक श्री. अजित ठाणेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य श्री. सुशील भांदिगरे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी आणि श्री.  निगवेकर, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदवराव पवळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह गणेशभक्तही उपस्थित होते.

पंचगंगा नदीत ३६५ दिवस जयंती नाल्याचे पाणी, तसेच साखर कारखान्यांचे मळिमिश्रीत पाणी मिसळते. या प्रदूषणाकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करते. मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळल्याने अनेक वेळा नदीत मासे मृत्यूमुखी पडले. श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यावर मासे मृत झाल्याची घटना झाली नाही. त्यामुळे महापालिकेने नाटकीपणा आता बंद करावा आणि गणेशभक्तांना नदीत विसर्जन करण्यास अनुमती द्यावी.

– श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती


गतवर्षी गणेशभक्तांनी ‘बॅरिकेड्स’ तोडून श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले होते आणि यंदाही तेच होणार ! – दीपक देसाई

गतवर्षी गणेशभक्तांचा मोठ्या प्रमाणात विरोध असतांनाही जाणीवपूर्वक महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदीवर श्री गणेशमूर्ती विसर्जन होऊ नये; म्हणून पंचगंगा नदी परिसर ‘बॅरिकेड्स’ लावून बंद केला. त्या वेळी गणेशभक्तांचा उद्रेक झाल्यावर त्यांनी  ‘बॅरिकेड्स’ तोडून नदीतच विसर्जन केले. यंदाही महापालिका प्रशासन गणेशभक्तांच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे यंदाही भाविक पंचगंगा नदीतच विसर्जन करण्यावर ठाम आहेत. वारंवार प्रदूषण आणि उच्च न्यायालयाचा संदर्भ देणारे महापालिका प्रशासन आम्हाला उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचे सांगत होते; प्रत्यक्षात महापालिकेने ना आम्हाला चर्चेसाठी बोलावले ना निर्देश दाखवले.

१२ सप्टेंबरचे श्री गणेशमूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, यांसाठी हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी श्रीफळ अर्पण करून तिची ओटी भरण्यात आली. या प्रसंगी महिला प्रतिनिधीही उपस्थित होत्या.

संपादकीय भूमिका

  • श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार विसर्जन करण्यावर ठाम रहाणारे गणेशभक्त इतरांसाठी आदर्श !
  • प्रशासन असे हिंदु धर्मद्रोही निर्णय अन्य धर्मियांविषयी घेते का ? 
  • प्रशासन हिंदूंच्या धार्मिक भावना न दुखावता आणि धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी पर्याय का काढत नाही ?
  • हिंदुत्वनिष्ठांना असा निर्णय घेण्याची वेळ न येण्यासाठी प्रशासन काही तोडगा काढेल का ?