डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील विद्यार्थिनीचा धर्मांध कंत्राटी कर्मचार्‍याकडून छळ !

छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापिठात ‘लव्ह जिहाद’ !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – उत्कर्ष महोत्सवासाठी जळगाव येथे गेलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संघातील एका विद्यार्थिनीला रात्री-अपरात्री व्हिडिओ संपर्क करून एका धर्मांध कंत्राटी कर्मचार्‍याने छळल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थिनीने तक्रार करूनही ‘तक्रार निवारण समिती’ने कारवाईऐवजी त्या धर्मांध कर्मचार्‍याला अभय दिले.
हे प्रकरण २ महिने जुने असले, तरी कंत्राटी कर्मचार्‍यावर कारवाईच्या मागणीसाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या दालनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अ.भा.वि.प.) २२ ऑगस्ट या दिवशी घोषणा देत ‘ठिय्या आंदोलन’ केले. (असे आंदोलन का करावे लागते ? – संपादक) या वेळी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. प्रशासनाने अभाविप कार्यकर्त्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (तक्रार करूनही विद्यापिठातील तक्रार निवारण समिती हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे यातून दिसून येते. विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरु यांच्या अशा वागण्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळते. त्यामुळे या प्रकरणी कुलगुरूंवरही कठोर कारवाई करायला हवी. तसेच धर्मांधाविरुद्ध कारवाई न करता उलट आंदोलकांची तक्रार करणार्‍यांचीही चौकशी झाली पाहिजे. – संपादक)

१. राजभवनद्वारे राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सव, जळगाव येथे आयोजित केला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनीही संघात विद्यापिठाद्वारे सहभागी झाली होती.

२. संघासमवेत गेलेल्या एका धर्मांध कंत्राटी कर्मचार्‍याने त्या विद्यार्थिनीला प्रेमजालात फसवण्याचा प्रयत्न केला होता. प्रारंभी तिने दुर्लक्ष केले होते; मात्र महोत्सव संपल्यावर धर्मांधाने ‘व्हिडिओ कॉल’ करून त्रास दिला. या विद्यार्थिनीने धर्मांधाच्या विरोधात विद्यापिठाकडे १६ मे या दिवशी तक्रार केली.


३. कुलगुरूंनी ही तक्रार विशाखा समिती अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे पाठवली; पण ‘विद्यार्थिनी संलग्नित महाविद्यालयाची असून विद्यापिठाची नाही’, असे कारण सांगून तक्रार निकाली काढली होती. यात त्या धर्मांधाला अभय मिळाले.

४. महाविद्यालयाच्या समितीकडे किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी, असे अजब समुपदेशनही पिठासन अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांनी दिले.

५. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या व्याख्येत ही तक्रार बसत नसल्याचा जावईशोधही त्यांनी लावला. (धर्मांधाने संबंधित अधिकारी किंवा त्यांच्या मुलीला असाच त्रास दिला असता, तर त्यांनी असे वक्तव्य केले असते का ? अशा निष्क्रीय आणि बेफिकीरपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई अपेक्षित !  – संपादक)

आंदोलन छेडल्यानंतर कुलगुरु डॉ. फुलारी यांनी विशाखा समिती आणि विद्यार्थिनी यांची एकत्रित बैठक घेतली. बैठकीत विद्यार्थिनीचे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी घेण्याचे आदेश दिले आहेत.

संपादकीय भूमिका

तक्रारींचे निवारणच केले जात नसेल, तर ‘तक्रार निवारण समिती’चा उपयोगच काय ? अशी समिती बरखास्त करा !