रासायनिक पाणी सोडल्याने पंचगंगेच्या पाण्याला उग्र वास !

पंचगंगा नदी

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पंचगंगा नदी परत एकदा प्रदूषित झाली असून काही घटकांनी रासायनिक पाणी नदीत सोडल्याने पाण्याला फेस आला आहे. यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्याला उग्र वास येत आहे. सध्या तेरवाड बंधार्‍याच्या अलीकडे नदीचे पात्र जलपर्णीने (नदीत वाढणार्‍या एक वनस्पतीने) व्यापले असून पाणी रसायनयुक्त झाल्याने ते फेसाळणारे पांढरे दिसत आहे. (याविषयी प्रशासन काही उपाययोजना काढणार आहे कि नाही ? – संपादक)

पंचगंगेचे पाणी हे शिरोळ बंधार्‍यातून पुढे वहात येऊन नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत मिसळते. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे कृष्णा नदीही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच समवेत हेच पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याने शेतीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण करणार्‍या घटकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, शेतकरी यांनी प्रशासनाकडे केली आहे. पावसाळा चालू होऊन नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होण्यास प्रारंभ झाल्यावर प्रतिवर्षी बहुतांश वेळा हा प्रकार होतांना दिसतो; मात्र यावर प्रदूषण मंडळाने नेहमीच तोंडदेखली कारवाई केली आहे.

संपादकीय भूमिका

  • वर्षानुवर्षे पवित्र नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणार्‍यांवर कठोर कारवाई न करणे हे प्रशासनाला लज्जास्पद !

  • दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !