विधीमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विधीमंडळातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या वेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की,

१. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला, युवा, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांसह सर्व वर्गांसाठी निर्णय घेतले. या अधिवेशनात ९ विधेयके संमत झाली.

२. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळला. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण दिले आहे.

३. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचार्‍यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन देण्याच्या संदर्भातचा निर्णय घोषित केला. यासंबंधीही शासकीय कर्मचार्‍यांना शब्द दिला होता, तो या निमित्ताने पाळला.