हिमालयात यंदा बर्फ न्यून पडण्याची कारणे काय ?

यंदाच्या हिवाळ्यात हिमालयीन भागांत न्यून बर्फ पडला आहे. हीच स्थिती जगभरात आहे. असे का झाले ? आणि त्याचा परिणाम काय होईल ? याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

१. हिमालयात यंदा बर्फवृष्टी न्यून का झाली ?

ऑक्टोबर ते जानेवारी हे ४ मास भारतात हिवाळा असतो. हिमालयीन भागात काश्मीर खोर्‍यासह डिसेंबर आणि जानेवारी या मासांमध्ये सर्वदूर बर्फ पडतो. प्रत्येक हिवाळ्यात थंडीच्या ५ ते ६ लाटा येतात; पण यंदा डिसेंबरमध्ये एक-दोन अपवाद वगळता थंडीच्या लाटा आल्या नाहीत. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात थंडीच्या २-३ लाटा आल्या, तेव्हा काश्मीरसह हिमालयीन भागात डिसेंबर मासाच्या काळात होणारी बर्फवृष्टी चालू झाली. असे असले, तरीही १५ फेब्रुवारीपर्यंत काही प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यंदा गुलमर्ग, सोनमर्ग, काश्मीर आणि लेह-लडाख परिसरात अल्प बर्फवृष्टी झाल्याचे स्थानिक सांगत आहेत. काही अभ्यासकांनीही प्रतिवर्षापेक्षा बर्फवृष्टी न्यून झाली, या मुद्याला दुजोरा दिला आहे.

२. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती खोर्‍याची स्थिती

लाहौल-स्पिती खोरे यंदा जानेवारी अखेरपर्यंत जवळपास बर्फविरहित होते. ‘जानेवारी अखेरपर्यंत या खोर्‍यात किमान ४ ते ५ फूट बर्फ पडायला हवा होता; पण तो पडला नाही, हे गंभीर आणि चिंता करण्यासारखे आहे; कारण बर्फवृष्टीमुळे वर्षभराची पाण्याची तजवीज होते. स्थानिकांना सिंचन आणि शेती यांसाठी पाणी मिळते’, असे ‘सेव्ह लाहौल-स्पिती सोसायटी’चे उपाध्यक्ष विक्रम कटोच यांनी म्हटले आहे. सेव्ह लाहौल-स्पिती सोसायटी ही स्वयंसेवी संस्था खोर्‍याचा पर्यावरणाच्या दृष्टीने होणारा र्‍हास रोखण्याचा प्रयत्न करते.

३. काश्मीर खोर्‍यातील स्थिती काय ?

काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग ही पर्यटन क्षेत्रे डिसेंबर अखेरीस पर्यटकांनी भरून जातात. यंदा बर्फवृष्टीच झाली नसल्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. चिल्लई कलां (चिल्लई कलान) हा काश्मीरमधील सर्वाधिक थंडीचा काळ मानला जातो. तो २१ डिसेंबर ते २९ जानेवारी असा ४० दिवसांचा असतो. या काळातही खोर्‍यात अपेक्षित बर्फवृष्टी झाली नाही. ३० जानेवारी या दिवशी हलकी बर्फवृष्टी झाली, तोपर्यंत चिल्लई कलां हा काळ बर्फविरहित होता. श्रीनगर शहरात १४ जानेवारी या दिवशी हिवाळ्यातील विक्रमी तापमानाची नोंद, म्हणजेच पारा १५ अंश सेल्सिअसवर पोचला होता. तो दिवस मागील १४ वर्षांच्या हिवाळ्यातील सर्वांत उष्ण दिवस होता. १० जानेवारी या दिवशी भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सोनम लोटस यांनी ‘लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश अन् उत्तराखंडच्या उत्तरेकडील प्रदेश यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पुष्कळच न्यून बर्फ पडला’, असे म्हटले होते. जानेवारी अखेरीस काश्मीरसह हिमालयीन भागांत बर्फवृष्टी चालू झाली असून ती सरासरीइतकी होते का ? याकडे लक्ष लागले आहे.

४. बर्फवृष्टी न्यून का झाली ?

उत्तर अटलांटिक निर्देशांक (नॉर्थ अटलांटिक इंडेक्स) डिसेंबरपर्यंत सक्रीय नव्हता. जानेवारीपासून उत्तर अटलांटिक निर्देशांक सक्रीय होण्यास प्रारंभ झाल्यामुळे जानेवारीच्या अखेरीस हिमालयात पश्चिम विक्षोपाचा जोर काहीसा वाढला आहे. हा जोर फेब्रुवारी मासात न्यून होतो. त्यामुळे बर्फवृष्टीसाठी अत्यंत कमी काळ राहिला आहे. उत्तरेकडून, म्हणजे अगदी रशियापासून येणार्‍या थंड वार्‍याच्या प्रवाहामुळे हिमालयीन पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असते; पण यंदा उत्तरेकडून येणारे थंड वारे उशिराने हिमालयीन रांगांत दाखल झाले आणि डिसेंबरमध्ये आलेल्या पश्चिमी विक्षोपात फारसा जोर नव्हता. त्यामुळेच डिसेंबरपर्यंत ना फार बर्फ पडला, ना उत्तर भारतात फार थंडी पडली. जानेवारी अखेरीस सलग ३ पश्चिमी विक्षोप हिमालयीन प्रदेशात सक्रीय झाले होते. त्याचा परिणाम म्हणून जानेवारीच्या अखेरीस काश्मीरसह हिमालयीन भागांत बर्फवृष्टीला पोषक वातावरण निर्माण होऊन बर्फवृष्टी चालू झाली होती.

५. न्यून बर्फवृष्टी झाल्याचा परिणाम काय ?

हिमालयाच्या रांगांमध्ये न्यून बर्फवृष्टी झाल्याचा मोठा फटका भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि चीन या देशांना बसू शकतो. हिमालय हा जगातील जवळपास १५० कोटींहून जास्त लोकांसाठीचा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. हिमालयात सहस्रो लहान-मोठ्या हिमनद्या आहेत. वरच्या भागातील नद्यांना हिम वितळून पाणी मिळत असल्याने त्या बारमाही वाहतात. या नद्या वर्षभर शेतीला, पिण्याला, उद्योगांना पाणी देतात. नजीकच्या काळात या नद्यांना पाणी न्यून पडणार नाही; पण असाच अपुरा बर्फ पडत राहिला, तर या नदी खोर्‍यातील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. यंदा बर्फवृष्टीशी संबंधित पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे. ही धोक्याची चेतावणी देणारी घटना असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

– दत्ता जाधव
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, ७.२.२०२४)