प्रभु श्रीरामाचा वनवास आणि भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना !

आजच्या तरुण पिढीने श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्याकडून संयम, तत्त्वनिष्ठा आणि ध्येयासक्ती शिकल्यास जीवन यशस्वी होईल !

‘श्रीराममंदिर संकुल’ चरित्र निर्माण केंद्र व्हावे !

विवेक सिन्नरकर

आजचा आधुनिक भारत आणि युवा संभ्रमित आहे. राष्ट्र-धर्म कर्तव्य, नेतृत्व, संवेदनशीलता, स्वपराक्रम, स्वाभिमान यांविषयी तत्त्वाला मुरड घालून क्षणिक लाभासाठी स्वत्वपणाला लावण्याचा धोका पत्करत असेल, तर तेथे श्रीरामांच्या प्रामुख्याने वनवास काळातील जीवनाचा अभ्यास युवा पिढीला योग्य मार्गावर आणू शकेल. आजचे युग हे नवनिर्मितीचे आहे. त्याच वेळी ‘चरित्र निर्मितीचा’ विसर पडत आहे. त्यावर रामायण अभ्यास हे रामबाण उत्तर आहे. नूतन श्रीराम मंदिर संकुल युवाशक्तीचे चरित्र निर्माणाचे केंद्र व्हावे, ही अपेक्षा ! – श्री. विवेक सिन्नरकर

श्रीरामरायाचा वनवास मार्ग अभ्यासण्यासारखाच आहे. या मार्गात प्रभु रामचंद्रांनी सामाजिक समरसतेचा संदेश दिला आहे. सज्जन शक्तीचा उदय, विकास आणि प्रकाश पसरवत असतांनाच सर्वदूर अक्षय जीवनमूल्यांचे रक्षण कसे करावे, याचा वस्तूपाठ श्रीरामायणातील ‘वनवास पर्व’ जगाच्या अंतापर्यंत देत राहील. जीवनातील संघर्ष स्वीकार करत त्यावर मात करण्यास वनवास पर्व शिकवते.

१. एकश्लोकी रामायण

आदौ रामतपोवनाभिगमनं हत्वा मृगं काञ्चनं
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं
पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम् ॥

अर्थ : आरंभी रामाचे वनात जाणे, त्यानंतर सुवर्णमृगाची मृगया (शिकार) होणे, सीताहरण, जटायूचे मरण, राम-सुग्रीव मिलन, वालीचे दमन, समुद्र ओलांडणे, लंकादहन आणि त्यानंतर रावण अन् कुंभकर्ण यांचा नाश या रामायणातील महत्त्वाच्या घटना होत.

यानंतर श्रीरामाची मित्रता सुग्रीव (आणि हनुमंत) यांच्याशी झाली आणि श्रीरामाने त्याच्याशी (परस्पर सहकार्याची) चर्चा केली. त्यानंतर श्रीरामाने (सुग्रीवाचा दुष्ट बंधू) वालीचा वध केला. मग समुद्रावर सेतू बांधून (वानर सेनेसह) समुद्र पार केला. तत्पूर्वी हनुमानाने लंकापुरीचे पूर्ण दहन केले. यानंतर (राक्षसकुळासह) कुंभकर्ण आणि रावण यांचा (श्रीरामाने) वध केला. ही (सीता मुक्तीपर्यंत) पूर्ण रामायणाची संक्षिप्त कहाणी आहे. या एकश्लोकी रामायणात ‘वनवासी रामाचे पराक्रम’ प्रामुख्याने आहेत. त्यांचे नित्य स्मरण केल्यास आपणही जीवनात विजयी होतो.

२. भारतियांचे श्वास आणि निःश्वास

महर्षि वाल्मीकिकृत ‘रामायणा’मध्ये कमीत कमी २४ सहस्र श्लोक आहेत. त्यांचा अभ्यास आणि पारायणे देशात सहस्रो वर्षे अखंड चालूच असतात. वरील संस्कृत ‘एकश्लोकी रामायणा’द्वारे संपूर्ण रामायण पाठ केल्याचे पुण्य सहज प्राप्त होऊ शकते. हा श्लोक जपल्याने श्रीराम आणि श्री हनुमान यांची कृपा प्राप्त होऊन रामायण आत्मसात् होते. वरील एक श्लोक म्हणजे भारतियांचा ‘श्वास आणि निःश्वास’ आहेत. रामायण कथामृत सहस्रो वर्षे भारत आणि भारतीय उपखंडात सर्वांना प्रेरणा देत आहे अन् अखंड देत राहील.

३. भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना

वनवास काळ हा धैर्यवान व्यक्तीस काय शिकवतो, तर प्राप्त परिस्थितीत वचनबद्ध रहाणे, येणार्‍या संकटांना तोंड देतांना नीती न सोडणे, शत्रूचा जो बलवान शत्रू असेल त्याच्याशी मित्रता करणे, सामान्य जनांच्या अस्मितेला फुंकर घालून त्यांचे संघटित सैन्यात रूपांतर करणे, शत्रूचे घर भेदून त्याचे मनोबल खच्ची करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसून त्याचे पारिपत्य करणे आणि स्वातंत्र्याची द्वाही फिरवणे.

‘निजबळे निजशक्ती सोडविली सीता । म्हणुनि येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।।’ याप्रमाणे सीतामातेची सन्मानपूर्वक सुटका स्वबळावर केली, म्हणून श्रीराम अयोध्येत सन्मानाने परत आले, हे महत्त्वाचे सार आहे. ही उत्कंठा वनवासाच्या काळातील कथेचा उत्कलबिंदू आहे. हे कथानक सर्वांना मार्गदर्शक आहे. हे वनवासपर्व भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचे महान कार्य करत आहे.

४. वनवासी राम ते पुरुषोत्तम राम

पृथ्वीपालन आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे रक्षण अन् संवर्धन करणे, हे केवळ मानव जन्मातच शक्य आहे. देवतांसह मानवांनीही हे आद्यकर्तव्य कसे पार पाडावे, हे श्रीरामायण रसाळ कथेत गुंफून आपल्याला सहज सांगते. श्रीरामांसह सर्वांनीच कठोर वनवास सहन करत करत भोगला. अग्निपरीक्षा दिली, आक्षेप झेलले, त्यातून रामायणरूपी सोने अधिकच झळाळत गेलेले आज दिसते. त्यातील चरित्रे ही आपलीशी वाटतात. आजच्या तरुण पिढीने श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्याकडून तत्त्वनिष्ठा, संयम आणि ध्येयासक्ती शिकावी. त्यानेच ते जीवनात यशस्वी होतील.

रामायणातील परमोच्च रोमांचक, जीवनदायी आणि वरदायिनी काळ, म्हणजे श्रीराम-सीता अन् लक्ष्मण यांचा वनवास. मुळात मोठ्या नवसायासाने प्राप्त झालेली दशरथ राजाची ही मुले स्त्रीहट्ट आणि पुत्रप्रेम यांच्यामुळे त्यांच्या देखत विभागली गेली. राज्यलोभ आणि जनमताचा विसर पडल्यावर सत्ता संघर्षाची ठिणगी पडूनही संयम अन् वचनबद्धता यांचे धीरोदात्त दर्शन प्रभु श्रीराम, साध्वी सीता, वीर लक्ष्मण, महात्मा भरत आणि खंबीर शत्रुघ्न हे देतात. त्यातून रामायणाची उंची अंतापर्यंत वर्धिष्णू होत रहाते. ऋषिमुनी आणि वेदप्रणित संस्कृतीस मान्य असे हे आर्षकाव्य. श्री नारदकथित आणि मुनी वाल्मीकि रचित अक्षय मुक्ती देणारा ‘रामायण’ हा पवित्र ग्रंथ आहे. जीवनातील संघर्ष स्वीकारून त्यावर मात करणे वनवासपर्व शिकवते.

५. स्वदेश भक्तीचे आद्यप्रणेते

‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।’, म्हणजे ‘(लंका सोन्याची जरी असली तरी) मला माझी माता आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही थोर वाटतात’; म्हणून भरतभूमीचा गौरव करणारे श्रीराम हे खरे राष्ट्रपुरुष म्हणावे लागतील. स्वदेश भक्तीचे आद्यप्रणेते श्रीराम देशभक्तीचे प्रकटीकरण करतात. उत्तर भारत आणि दक्षिण, पूर्व-पश्चिम भारत जोडण्याचे कार्य रामायण सहज करते. ऋषिमुनी, नावाडी, भिल्ल, वनवासी, वानर जातीपासून वन्यप्राणी, वृक्ष, पर्वत, नद्या, शिळा, पतित शबरीसह अनेक साधक मुनी, राक्षस, शापित असुर, वानर, पक्षी, प्राणी या सर्वांना मुक्तीसह अभय दिले. श्रीरामाने वनवास प्रवासात जनसामान्यांची नोंद घेऊन एकप्रकारे सामाजिक समरसता आणली.

६. श्रीरामांचे दैवी गुण

श्रीरामाने रघुकुल नीतीने पिताश्री दशरथांचे वचन खरे करण्यासाठी वनवास गमन सहज स्वीकारले. नुसते स्वीकारले नाही, तर संकटाचे सुसंधीत परिवर्तन केले. सज्जन शक्तीला जागवले. त्यांनी दंडकारण्यात राक्षसपीडित ऋषिमुनींचे रक्षण केले. सहस्रो दुष्ट राक्षस मारले. रघुकुलाचे महत्त्व वाढवले. वानर आणि वन्य प्राणी यांचे संघटन केले. हनुमंत, सुग्रीव यांना बंधुवत् प्रेम दिले. बिभीषणास मित्र बनवून राज्य दिले. बंधूप्रेम, एकपत्नी व्रत, शौर्य आणि अंगभूत प्रभुता, राजाचे कर्तव्य, शरणागतास अभय देणे अन् सुवर्णमयी लंकेचा मोह त्यागून, स्वतःची जननी आणि जन्मभूमी यांचा गौरव करणे, या धीरोदात्त दैवी गुणांचे स्वआचरणातून दर्शन दिले.

ही वनवास पर्वाची देणगी आहे. श्रीराम वनवासात जेथे जेथे गेले, तेथे तेथे अयोध्येचा विस्तार झाला. श्रीरामाच्या १४ वर्षांच्या वनवासाने भारतवर्ष आसेतुहिमाचल अखंड झाला. आजच्या भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक एकात्मता श्रीरामाच्या वनवासाचे फलित आहे.

७. श्रीरामाचा वनवास मार्ग

अयोध्या ते श्रीलंका या वाटचालीत श्रीरामाने उत्तर भारतातील तमसा नदी, कोशल प्रांत, शृंगवेरपूर, प्रयाग, गंगा-यमुना खोरे, चित्रकूटमार्गे भयानक दंडकारण्यात प्रवेश केला. शृंगवेरपूरचा निषादराजा गुह याचे आतिथ्य स्वीकारले. या बालमित्राकडून गंगा पार करण्यास श्रीरामांनी साहाय्य घेतले. येथून पुढे राजपुत्र श्रीराम ‘तपस्वी श्रीराम’ झाले.

पुढे प्रयागमध्ये भरद्वाजमुनींचा आश्रम, यमुना नदी पार करून चित्रकूट पर्वतावर महर्षि वाल्मीकि यांच्या सूचनेप्रमाणे माल्यवती नदीकाठी पर्णकुटी बांधून भरत भेटीपर्यंत राहिले. तेथून शृंगवेरपूरजवळील कुराई येथून गंगा पार करून चित्रकूटपासून दक्षिणेकडे, अत्रीऋषि आणि श्री दत्तमाता अनसूया यांच्या आश्रमात मुक्काम केला. अनसूयामातेने सीतेला दिव्य अलंकार भेट दिले. शरभंग ऋषि, सूतीक्ष्णमुनी, वालखिल्यमुनी, अगस्त्यऋषि यांच्या भेटी घेतल्या. सनातन संस्कृती, यज्ञ आणि आश्रमव्यवस्था यांचे रक्षण केले. योद्धा संन्यासी अगस्त्यऋषींनी श्रीरामाला विश्वकर्मानिर्मित अमोघ धनुष्यबाण संच आणि सुवर्ण तलवार भेट दिली. त्यामुळे हा वनवास श्रीरामाला सुसह्य झाला. दक्षिण दिग्विजय करून त्यांनी धर्मस्थापना आणि दुष्टांचे निर्दालन केले, हे विदितच आहे.

पंचवटी येथील दीर्घ वास्तव्यात लोकसंग्रह, राक्षस मर्दन करतांना शूर्पणखा, मारिच राक्षस आणि कपटी रावण यांनी केलेले सीताहरण याने प्रक्षुब्ध झालेल्या श्रीरामाने हनुमंतासह वानरसेनेच्या साहाय्याने रावण वध केला. पुढे सीतामाईसह वनवास पूर्ण करून अयोध्येत विजयी प्रवेश केला. या प्रदीर्घ प्रवासात जेथे जेथे सीतारामांचे पवित्र चरण लागले, निवास झाला ती स्थळे आणि सर्व वनवास मार्ग पवित्र तीर्थक्षेत्र झाला आहे. त्यात आताचे प्रयाग, जबलपूर, रामटेक, पंचवटी, लोणार तळे, हंपी, अनेगुंदी, केरळ, तमिळनाडूतील महेंद्रगिरी प्रदेश, त्रिचनापल्ली, रामनाथपूरम्, रामेश्वरम्, धनुष्यकोडी सेतूबंध ही स्थळे मोक्षदायी आहेत.

८. श्रीरामाचे कठोर नियम पालन

श्रीरामाला १४ वर्षे वनवास, म्हणजे नक्की काय होते ? त्या १४ वर्षांच्या काळात कुठल्याही नागरी भागात जाण्यास बंदी, वल्कले नेसून विजनवासात रहाणे, कुणाशीही संपर्क टाळणे, कंदमुळे अन् फळे खाऊन कुटीमध्ये कष्टात राहून जीवन जगणे, कुठलेही सुखोपभोग न घेणे, संयत आणि संन्यस्त वृत्तीने रहाणे या सर्व माता कैकेयीच्या कठोर अटी होत्या. कदाचित् त्या प्रभु श्रीरामाच्या धैर्याची कसोटी पहात असतील. याचा व्यावहारिक अर्थ असा होतो की, श्रीरामाचा अयोध्येच्या राज्यावरील अधिकार कायमचा काढून घेणे. संपत्ती, मानसन्मान आणि सैन्य हिरावून घेणे. साधारण १२ अथवा १४ वर्षांनी माणसाचे कायदेशीर अधिकार संपुष्टात येतात. ‘त्यांचे अस्तित्व संपल्याचे घोषित करता येते’, असा पूर्वापार चालत आलेला लोक व्यवहार होता आणि आहे. अर्थात् श्रीरामाने त्याचे कठोर पालन केलेले दिसते. ते कंदमुळे खाऊन राहिले. भूमीवर झोपले. वल्कले भगवी वस्त्रे परिधान केली. किष्किंधानगरी आणि शेवटी श्रीलंकेत स्वतः प्रवेश केला नाही. युद्धात अयोध्येचे सैन्य मागवले नाही. वानरसेना उभी करून स्वबळावर रावण वध केला.

हा लेख वाचून ‘देशापुढे असलेली आव्हाने पेलण्याची शक्ती आणि बुद्धी श्रीराम आम्हाला देवो’, ही त्याच्या चरणी प्रार्थना !

श्री. विवेक सिन्नरकर, आर्किटेक्ट आणि रामायणाचे अभ्यासक, पुणे (२२.१.२०२४) (साभार : दैनिक ‘सकाळ’, श्रीराममंदिर विशेष पुरवणी)