(म्हणे) ‘अजित पवार यांनी पुरोगामी विचारधारा जपण्यासाठी टी. राजासिंह यांच्या सभेला अनुमती देऊ नये !’ – आमदार रोहित पवार

हुपरी (कोल्हापूर) येथील हिंदुत्वनिष्ठांच्या सभेला आमदार रोहित पवार यांचा विरोध

डावीकडून रोहित पवार, आमदार टी. राजासिंह आणि अजित पवार

कोल्हापूर – प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी. राजासिंह यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आले आहे. हे आमदार कोल्हापुरात येऊन येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नयेत, अशी पुरोगामी विचारधारा जपणार्‍या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून लिहिले आहे. (भाजपचे आमदार टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असून ते नेहमी सत्य आणि हिंदुत्वाच्या बाजूने बोलतात. क्रूरकर्मा औरंगजेब आणि त्याला आताही समर्थन करणार्‍यांच्या विरोधात टी. राजासिंह रोखठोक बोलतात. त्यामुळेच मुसलमान समाजाचेच तुष्टीकरण करणार्‍या शरद पवार यांचा नातू असलेले रोहित पवार यांचा त्यांना विरोध आहे, हे लक्षात येते. हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या अकबरुद्दीन औवेसी आणि संभाजीनगर येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणार्‍या औवेसी यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी कधी रोहित पवार यांनी का केली नाही ? प्रभु श्रीरामाविषयी अश्‍लाघ्य विधाने करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी रोहित पवार यांनी केली नाही, हेही हिंदू ओळखून आहेत ! – संपादक)

सौजन्य सकाळ

कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली; परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. (कोल्हापूर हे पुरोगामी विचारधारेचे नाही, तर हिंदुत्वनिष्ठ विचारधारेचे आहे, हे गेले काही वर्षांमध्ये झालेल्या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधी मोर्चामधून, हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना धडा शिकवून दाखवून दिले आहे ! – संपादक)

रोहित पवार आणि त्यांच्यासारख्या छुप्या विरोधकांना हुपरीतील हिंदूंनी सभेसाठी १४ सहस्रांहून अधिक संख्येने उपस्थिती दर्शवून सणसणीत चपराक !

कोल्हापूर – ३० जानेवारीला टी. राजासिंह यांची हुपरी येथील सभा यशस्वी न होण्यासाठी आमदार रोहित पवार आणि त्यांच्यासारखे काही छुपे विरोधक यांनी प्रयत्न केले; मात्र १४ सहस्रांहून अधिक हिंदूंनी सभेसाठी उपस्थिती दर्शवून त्यांना सणसणीत चपराकच दिली आहे. ‘संघर्ष जितना बडा होता है जीत उतनीही शानदार होती है’, या उक्तीप्रमाणे या सभेच्या माध्यमातून हिंदूंनी संघटित होऊन चंदेरी नगरीत हिंदुत्वाचे नाणे खणखणीत चालल्याची चेतावणी धर्मविरोधकांना दिली.