हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड

  • रायपूर येथे एका दिवसाचे छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

  • ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची केली स्थापना !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. मदनमोहन उपाध्याय, पू. अशोक पात्रीकर, पं. नीळकंठ महाराज, पू. रामबालकदास महाराज, पू. युधिष्ठिरलाल महाराज आणि श्री. सुनील घनवट

रायपूर (छत्तीसगड) – ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी, जिहादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि खलिस्तानी यांचे अशोभनीय संगम हिंदु धर्म नष्ट करण्याचे काम करत आहे. हिंदु संघटना, संत, कार्यकर्ते आणि अधिवक्ते यांची युती करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन छत्तीसगड राज्याचे भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा यांनी येथे केले. ते शदानी दरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दिवसाच्या छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला संबोधित करत होते.

पू. शदानी दरबार तीर्थ, श्री नीळकंठ सेवा संस्थान, मिशन सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. पू. युधिष्ठिरलाल महाराज, पू. रामबालकदास महात्यागी, पं. नीळकंठ त्रिपाठी महाराज आणि पू. अशोक पात्रीकर या संतांच्या मंगलहस्ते दीपप्रज्वलनाने हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला. या संमेलनात ‘६५९’ या श्रीरामजन्मभूमीच्या लढ्यावर आधारित चित्रपटाचे निर्माते शाम चावला, भाजपचे ज्येष्ठ नेते सच्चिदानंद उपासनी, सीए असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमिताभ दुबे, शिवसेनेचे रायपूरचे आशिष परेडा यांच्यासह राज्यातील १२ हून अधिक जिल्ह्यांतील धर्माभिमानी, विविध हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, आचार्य, महंत, अधिवक्ता, प्राध्यापक आदी सहभागी झाले होते.

आगामी काळात रामराज्यही निर्माण होणार ! – उपमुख्यमंत्री विजय शर्मा

उपमुख्यमंत्री विजय शर्मा

उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे जगभरातील ज्यूंनी इस्रायल बनवण्याचा संकल्प केला, त्याचप्रमाणे हिंदूही त्यांचा संकल्प विसरलेले नाहीत. आज श्रीराममंदिर साकार झाले आहे. पुढचा संकल्पही निश्‍चितपणे पूर्ण होईल; मात्र  त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही निर्माण होणार आहे.

वक्फ कायदा हटवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करावा !

उपस्थित धर्मप्रेमी

उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा म्हणाले की, सध्या वक्फ कायद्यानुसार हिंदूंच्या भूमीवर बेकायदेशीरपणे नियंत्रण मिळवले जात आहे. मंदिरे कह्यात घेतली जात आहेत. हा काळा कायदा हटवण्यासाठी प्रत्येक गावातील हिंदूंनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सभेच्या प्रारंभी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

पू. डॉ. आठवलेजी आणि संत यांच्या नेतृत्वाखाली चालवलेले हे अभियान नक्कीच यशस्वी होईल ! – पू. युधिष्ठिरलाल महाराज

पू. युधिष्ठिरलाल महाराज

शदानी दरबारचे पू. युधिष्ठिरलाल महाराज म्हणाले की, आपण एका महान प्राचीन संस्कृतीचे अनुयायी असूनही आपण संघटित होऊ शकलो नाही. आपले राष्ट्र स्थापन करू शकलो नाही आणि हिंदु धर्माचा झेंडा फडकवू शकलो नाही. पू. डॉ. आठवलेजी आणि संत यांच्या नेतृत्वाखाली चालवलेले हे अभियान नक्कीच यशस्वी होईल आणि भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु जनजागृती समिती आणि पू. शदानी दरबार तीर्थ या संस्था धर्मग्रंथ, संत आणि दैवी शक्ति यांना अधिक महत्त्व देतात. यातून आपल्याला मिळणारी दैवी शक्ती शास्त्रांपेक्षाही अधिक महत्त्वाची आहे.

आध्यात्मिक बळावरच रामराज्यासारखे आदर्श हिंदु राष्ट्र साकार होईल ! – पू. अशोक पात्रीकर

पू. अशोक पात्रीकर

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर म्हणाले की, आज बांधलेले श्रीराममंदिर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा पाया आहे; पण हिंदु राष्ट्र आपल्याला कुणी भेट देणार नाही, तर त्यासाठी बलीदान द्यावे लागेल. धार्मिक आचरण आणि साधना करून आध्यात्मिक बळ निर्माण करावे लागेल. या आध्यात्मिक बळावरच रामराज्यासारखे आदर्श हिंदु राष्ट्र साकार होईल.

१. उद्घाटन सत्रात ‘राज्यावर धार्मिक सत्तेची आवश्यकता’ या विषयावर पू. रामबालकदास महात्यागी महाराज, ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद’ या विषयावर श्री. सुनील घनवट, ‘मंदिरांचे संघटन आणि मंदिरे सनातन धर्माच्या प्रसाराची केंद्रे कशी बनली ?’ या विषयावर श्री. मदन मोहन उपाध्याय, ‘हिंदु संघटनांमध्ये संतांची भूमिका आणि संतांचे कार्य’ या विषयावर पंडित नीळकंठ त्रिपाठी महाराज, ‘हिंदूंमध्ये भेदभाव करणार्‍या बुद्धीभेदाचा कसा सामना करावा ?’ या विषयावर श्री. संतोष तिवारी, ‘हिंदु संघटनांसाठी माध्यम व्यवस्थापनाची आवश्यकता’ या विषयावर श्री. अमित चिमनानी आदी मान्यवर वक्त्यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले.

२. ‘हिंदु धर्मावरील आघातांविरोधात केलेले कृतीशील प्रयत्न’ या विषयावर आयोजित परिसंवादात रणरागिणी ज्योती शर्मा, श्रीमती शर्मा, आचार्य शशिभूषण मोहंती, धर्मसेनेचे अध्यक्ष श्री. विष्णु पटेल, गोरक्षक श्री. अंकित द्विवेदी आदी मान्यवरांनी त्यांच्या  अनुभवांतून धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या आदी समस्यांवर मार्गदर्शन केले.

३. सामूहिक प्रयत्न करण्यासाठी सर्वांनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करून हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत संघटित प्रयत्न करण्याचा संकल्प केला. देवाच्या चरणी प्रार्थना आणि प्रतिज्ञा घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सांगता झाली.