जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून न सोडण्याचा कडक कायदा करायला हवा ! – प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘मुंबईजवळ गाझा पट्टी ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली गावात जाऊन राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. यामध्ये पकडलेल्या साकीब नाचन आणि त्याच्या सहकार्यांना पाकिस्तान, इराक अन् सीरिया आदी देशांतून त्यांना अर्थपुरवठा केला जात होता आणि सूचना दिल्या जात होत्या, असे अनुमान होते. पडघा-बोरीवली या मुसलमानबहुल गावात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे १५ पोलीस अधिकारी आणि ४०० स्थानिक पोलीस जेव्हा गेले, त्यानंतर त्यांना धाडी घालून कारवाई करता आली. यासंदर्भात पक्के पुरावे मिळाले, तेव्हाच पुढील कारवाई केली गेली. त्यामुळे ‘भविष्यातील संभाव्य आक्रमणे किंवा वाईट घटना टाळण्यात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला यश आले’, असे मानावे लागेल. वर्ष २००२ च्या मुंबई बाँबस्फोटात शिक्षा भोगलेल्या आतंकवादी साकीब नाचनला शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी सोडण्यात आले. ‘जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून सोडण्याची अनुमती न्यायाधीश आणि सुरक्षायंत्रणा यांना देऊ नये, असा कडक कायदा भारत सरकारने करावा’, अशी मागणी निवृत्त पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ केलेल्या ‘मुंबईजवळ गाझा पट्टी ?’, या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी समितीचे देहली येथील प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

आतंकवाद्यांना पूर्ण शिक्षा भोगायला लावली पाहिजे ! – प्रवीण दीक्षित

श्री. प्रवीण दीक्षित

अमेरिकेसारख्या देशात जन्मठेप किंवा ५० ते १०० वर्षे कारागृहात शिक्षा सुनावलेल्या दोषींची शिक्षा न्यून करत नाहीत. जामीन, पॅरोल (कैद्याची विशिष्ट मुदतीपुरती केलेली सशर्त मुक्तता) किंवा अन्य कारणाने आतंकवाद्यांची शिक्षा न्यून करू नये; कारण ते कारागृहातून बाहेर आल्यावर चुकीचीच कृत्ये करणार ! आतंकवाद्यांना उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहात ठेवून त्यांना पूर्ण शिक्षा भोगायला लावली पाहिजे. अनेक मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद केल्याने ते सुशिक्षित जरी असले, तरी ते आतंकवादी कारवायांत गुंतलेले आढळतात. भिवंडीसह भारतात कुठेही आतंकवादी किंवा कोणत्याही चुकीच्या कृती दिसल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पुढील कारवाईसाठी माहिती द्यावी.

पडघा-बोरीवलीसह जवळच्या गावात ‘इस्लामिक स्टेट’ करण्यासाठी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते ! – मनोज रायचा, कल्याण विभागाचे मंत्री, विश्व हिंदु परिषद

श्री. मनोज रायचा

 

वर्ष २०१२ मध्ये साकीब नाचन गटाने माझ्यावर प्राणघातक आक्रमण केले. त्या काळात साकीब नाचन गटाने हिंदुत्वाचे काम करणार्‍या ३ प्रमुख लोकांची हत्या केली. भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली गावात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांविषयी पाटी लावण्यालाही तेथील कट्टर मुसलमानांनी विरोध केला. या गावाला त्यांनी ‘अल् शाम’ असे इस्लामी नाव दिले आहे. येथे आतंकवादी संघटना ‘हमास’, ‘इसिस’चे झेंडे फिरवले जातात. भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली आणि जवळच्या गावात ‘इस्लामिक स्टेट’ करण्यासाठी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते.

पूर्वी भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली आणि नजीकच्या गावांत पोलीस सुद्धा जायला घाबरायचे. आता स्थिती थोडी पालटली आहे.