…तर मग बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कृतीत आणा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – सरकार केवळ मराठी आणि हिंदुत्व यांविषयी तोंड वाजवत आहे. न्यायालयाने सांगूनही दुकानांना मराठी पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. न्यायालयाने सांगूनही मशिदींवरील भोंगेही सरकारला काढता आलेले नाहीत.‘बाळासाहेबांच्या विचारांनी सरकार चालवता’ म्हणता, मग त्यांचे कोणते विचार कृतीत आणले ? ‘बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कृतीत आणा’, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

सरकारचा काही धाक आहे कि नाही ? न्यायालय, पोलीस, सरकार यांची भीती राहिली नाही, तर आपण अराजकतेकडे जाऊ, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले. अमली पदार्थांच्या रॅकेटविषयी पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, ‘‘अमली पदार्थांचे रॅकेट सर्व देशभरात पसरले आहे. माझा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे. पोलिसांना २४ घंटे मोकळीक दिली, तर सर्व वठणीवर येतील; परंतु तसे करायचे नाही. अमली पदार्थांचा पैसाच जर सर्वत्र वापरला जातो की काय ? अशी शंका येते.’’