गोशाळा चालवणार्‍या महाराजांवर पशूवधगृह चालवणार्‍याकडून प्राणघातक आक्रमण !

  • अहिल्यानगर येथील घटना !

  • पोलिसांचे दुर्लक्ष !

प्रतिकात्मक चित्र

अहिल्यानगर – पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावातील ह.भ.प. दीपक महाराज काळे आणि त्यांच्या पत्नी सौ. मनीषा काळे या ‘श्रीकृष्ण गोशाळा’ चालवतात, तसेच गोवंश जनावरांची नि:शुल्क सेवा करतात. आधी जे शेतकरी कसायांना त्यांच्या गायी विकत होते, ते शेतकरी आता ह.भ.प. काळे यांच्या गोशाळेत त्यांच्या गायी सोडत असल्याचा राग मनात धरून कसायांशी संबंधित असलेल्या दलालांनी ह.भ.प. काळे यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यासंदर्भात ‘पोलीस प्रशासन माझ्यावर आक्रमण झाल्याची कोणतीही दखल घेत नाही’, अशी खंत ह.भ.प. काळे यांनी व्यक्त केली आहे. या घटनेसंदर्भातील वृत्त ‘नगर न्यूज २४’ या स्थानिक यूट्यूब चॅनलने दिले आहे.

या घटनेची माहिती मिळताच नगर येथील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी, हिंदु जनजागृती समितीचे रामेश्‍वर भुकन, राहुल महाराज घुले आदींनी जिल्हा रुग्णालय येथे जाऊन घायाळांची भेट घेतली, तसेच गोरक्षकांवर होत असलेल्या आक्रमणाचा निषेध व्यक्त केला. या वेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

ह.भ.प. दीपक महाराज काळे यांनी सांगितले की, मी गेल्या १० वर्षांपासून श्रीकृष्ण गोशाळेच्या माध्यमातून गोसेवा करत आहे. कसायांना गायी पुरवणार्‍या दलालांना आम्ही ‘कसायांना गायी पुरवू नका’, असे सांगितले होते. तसेच समाजात कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही गोहत्या रोखण्यासाठी प्रसार करतो. ‘गायी कसायांना न देता आमच्या गोशाळेत द्या’, असेही सांगतो. या गोष्टीचा राग मनात धरून भारत बुधवंत, ज्ञानेश्‍वर बुधवंत, वासुदेव बुधवंत यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मला, माझ्या पत्नीला, तसेच कामगारांना रॉड अन् लाकडाने मारहाण करून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

  • गोरक्षण करणारे महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण व्हायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांचेच जीवन असुरक्षित असणे हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !
  • अशा दायित्वशून्य पोलिसांमुळेच गोतस्कर उद्दाम झाले आहेत. अशा पोलिसांवर कठोर कारवाई व्हायला हवी !