(म्हणे) ‘आतापर्यंत ४ हातवाले मूल जन्माला आले नसतांना ४ हातवाली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते ?’ – स्वामी प्रसाद मौर्य, समाजवादी पक्ष

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे आणखी एक संतापजनक विधान !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी यापूर्वी श्रीरामचरितमानसवर टीका केली होती. हिंदु धर्माविषयी अन्यही आक्षेपार्ह विधाने केली होती. आता त्यांनी श्री लक्ष्मीदेवीविषयी अत्यंत संतापजनक विधान केले आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत ४ हातांचे मूल जन्माला आले नाही, तर ४ हातवाली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते ? जर तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करू इच्छित असताल, तर पत्नीची पूजा आणि सन्मान करा, जी खर्‍या अर्थाने देवी आहे. ती तुमच्या परिवाराचे पालनपोषण करते आणि सुख-समृद्धी प्रदान करते. दायित्वही निष्ठेने पार पाडते’, असे विधान ‘एक्स’वरून पोस्ट करून केले आहे.

संपादकीय भूमिका 

‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो. अन्य धर्मियांच्या संदर्भात आणि अन्य देशांत अशांवर तात्काळ कठोर कारवाई झाली असती !