संपूर्ण जग आरोग्‍यसंपन्‍न करून माणसाला मानसिक दौर्बल्‍यातून बाहेर काढणारे मंत्रसामर्थ्‍य !

पद्मभूषण सौ. सुधा मूर्ती

१.  ५ मिनिटांच्‍या प्रार्थनेने मानवी शरिरात निर्माण होणार्‍या पेशी आधीच्‍या पेशींपेक्षा अधिक सबल आणि सतेज असणे

‘फिजिक्‍स अँड केमिस्‍ट्री ऑफ ह्युमन बॉडी’, या पुस्‍तकामध्‍ये परदेशी शास्‍त्रज्ञांनी विविध प्रयोग सांगितले आहेत. आमच्‍या देशामध्‍ये मंत्रशास्‍त्र आणि योगशास्‍त्र आहे; पण दुर्दैवाने आम्‍ही त्‍या शास्‍त्राचे महत्त्व जाणण्‍यासाठी प्रयोग केले नाही. परदेशी लोकांनी त्‍यासाठी अधिक प्रयोग केले आहेत.  ‘फिजिक्‍स अँड केमिस्‍ट्री ऑफ ह्युमन बॉडी’, या पुस्‍तकाचे लेखक हा एक शास्‍त्रज्ञ आहेत. ते म्‍हणतात, ‘‘हे संपूर्ण जग आरोग्‍यसंपन्‍न करायचे असेल आणि माणसाला सर्व मानसिक दौर्बल्‍यातून बाहेर काढायचे असेल, तर मला केवळ ५ मिनिटे द्या.’’ ते शास्‍त्रज्ञ असे सांगतात, ‘‘माणसाच्‍या शरिरात रक्‍तामध्‍ये चयापचय (metabolism) क्रिया होत असते. त्‍यामध्‍ये झीज आणि भर होत असते. प्रत्‍येक क्षणाला पेशी मरतात आणि त्‍याच वेळी नवीन पेशी जन्‍माला येत असतात. प्रती सेकंदाला रक्‍तातील ३० लाख पेशी मृत होत असतात आणि ३० लाख पेशी नव्‍याने जन्‍माला येतात. अशा प्रकारे संपूर्ण दिवसात या पेशींची झीज आणि भर होत असते.’’ ते शास्‍त्रज्ञ म्‍हणतात, ‘‘एका सेकंदाला ३० लाख, म्‍हणजे एका मिनिटाला १८ कोटी आणि ५ मिनिटांत ९० कोटी पेशी नव्‍याने जन्‍माला येतात. तुम्‍ही मनामध्‍ये दुसरा कोणताही विचार न आणता ५ मिनिटे तुम्‍हाला जेथे आवडेल, तेथे बसा आणि अंतःकरणापासून देवाचे नाव घ्‍या. प्रार्थना करा.’’ ते शास्‍त्रज्ञ म्‍हणतात, ‘‘५ मिनिटांच्‍या प्रार्थनेने ज्‍या १८ कोटी X (गुणिले) ५, म्‍हणजे ९० कोटी नव्‍याने जन्‍माला येणार्‍या पेशी या आधीच्‍या पेशींपेक्षा अधिक सबल आणि अधिक सतेज असतात.’’ हे कुणी भारतीय, परंपरावादी वा अंधश्रद्धावादी सनातनी सांगत नाही, तर एक शास्‍त्रज्ञ सांगत आहे.

२. नियमित ५ मिनिटे मंत्राचे वा स्‍तोत्राचे स्‍मरण केल्‍याने ७ वर्षांनंतर शरिरातील आधी-व्‍याधी दूर होणे 

असे ६ मास प्रतिदिन ५ मिनिटे न चुकता कुठल्‍याही एका मंत्राचे किंवा स्‍तोत्राचे स्‍मरण केले, तर या ५ मिनिटांमध्‍ये शरिरामध्‍ये निर्माण होणार्‍या नवीन पेशी अधिक सबल आणि सतेज असतील अन् त्‍याचा परिणाम तुम्‍हाला ६ मासांनंतर अनुभवायला येईलच. त्‍या शास्‍त्रज्ञाचा दावा आहे, ‘तुम्‍ही जर नियमित ५ मिनिटे मंत्राचे वा स्‍तोत्राचे स्‍मरण करत राहिला, तर ७ वर्षांनंतर तुमच्‍या शरिरामध्‍ये असणार्‍या सगळ्‍या आधी-व्‍याधी दूर झाल्‍याविना रहाणार नाहीत.’

३. एक मंत्र प्रमाण धरला, तर  अन्‍य मंत्र जपण्‍याची आवश्‍यकता नसणे 

मंत्राची पहिली शक्‍ती ही ‘प्रामाण्‍यशक्‍ती’ आहे. तुम्‍ही एका मंत्राला प्रमाण माना. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा त्रयोदाक्षरी मंत्र हा मला प्रमाण आहे; कारण प्रभु श्रीराम माझे आराध्‍य दैवत आहेत. ते आम्‍ही एकदा प्रमाणभूत मानले की, त्‍या मंत्राचाच जप करावा. एकदा एका मंत्राला प्रमाण मानले की, पुन्‍हा १० मंत्रांचा उच्‍चार करत बसण्‍याची तुम्‍हाला आवश्‍यकता नाही.

४. एक मंत्र स्‍वीकारून तो उच्‍चारला की, तो अधिक फळ देणारा ! 

मंत्रशास्‍त्र असे सांगते की, ‘जे केले आहे, त्‍याचे फळ मिळणारच आहे’, हा जगाचा नियमच आहे. भारतीय परंपरेमध्‍ये वैदिक परंपरेचे वैशिष्‍ट्य आहे, ‘जे कर्म करतो, त्‍या कर्माचे फळ आणि त्‍या फळापासून निर्माण होणारा संस्‍कार अन् त्‍या संस्‍कारातून पुन्‍हा कर्म’, ही सगळी चक्रे आहेत. केलेल्‍या कर्माचे फळ भोगल्‍याविना सुटका नाहीच. मंत्रशास्‍त्र सांगते की, जपलेल्‍या प्रत्‍येक मंत्राचे फळ अनुभवायला येतेच. केवळ ‘मंत्र जपला फळ मिळाले’, असेे ‘एकास एक’ प्रमाण नाहीच. ‘फलिनी’ नुसती शक्‍ती नाही, तर ती ‘बहुनी (शेकडो) शक्‍ती’ आहे. जसे एक बीज पेरले, तर त्‍याला शेकडो बीजे येतात. एक ज्‍वारीचा दाणा पेरला, तर त्‍या कणसामध्‍ये अनेक ज्‍वारीचे दाणे असतात. तसे आहे. एक मंत्र स्‍वीकारला आणि तो उच्‍चारला की, तो नुसते फळ देत नाही, तर तो अधिक फळ देतो.

५. मंत्राचे फळ हे मंत्र, ती व्‍यक्‍ती आणि स्‍थान या तिघांनाही सामर्थ्‍य प्राप्‍त करून देत असणे 

मंत्राची चौथी शक्‍ती ही आंतरग्राही शक्‍ती आहे. एक मंत्र ठरवून जागा आणि वेळ ठरवली अन् तेथे बसून त्‍या मंत्राचे ठरवलेल्‍या संख्‍येमध्‍ये अनुष्‍ठान केले, तर तो मंत्र, ती व्‍यक्‍ती आणि ते स्‍थान या तिघांनाही सामर्थ्‍य प्राप्‍त होते. याचे उदाहरण प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधर स्‍वामी यांनी आपल्‍या ‘आर्य संस्‍कृती’ पुस्‍तकात म्‍हटले आहे, ‘‘या ३३ कोटी देवता म्‍हणजे काय ? आमच्‍या भारत देशामध्‍ये निरनिराळ्‍या स्‍थानांवर तपाचरण करून आमच्‍या ऋषिमुनींनी अनेक स्‍थाने सामर्थ्‍यसंपन्‍न करून ठेवलेली आहेत. स्‍थाना-स्‍थानांवर सामर्थ्‍य प्रकट झाले आहे.’’ मंत्रशास्‍त्राचे सामर्थ्‍य सांगतांना ते म्‍हणतात, ‘‘फलिनी शक्‍ती, आंतरग्राही शक्‍ती, बहुनी शक्‍ती, प्रामाण्‍य शक्‍ती या रूपामध्‍ये मंत्र प्रकट होतात.’’

६. मंत्राचे प्रकार आणि त्‍यांचे सामर्थ्‍य 

आपल्‍याकडे पुढीलप्रमाणे मंत्राचे प्रकार केले आहेत, ‘ १ ते १० अक्षरापर्यंतचे मंत्र ‘बीजमंत्र’ आहेत. १० ते २० अक्षरापर्यंतचे मंत्र हे ‘कर्तरीमंत्र’ आहेत आणि २० च्‍या पुढची अक्षरे असणारे जे मंत्र आहेत ते मालामंत्र आहेत अन् त्‍याला मर्यादा नाही. ‘दासबोध’, ‘संपूर्ण ज्ञानेश्‍वरी’, ‘संपूर्ण एकनाथी भागवत’ हे सर्व मालामंत्र आहेत. मोठमोठे ग्रंथ हे मंत्रमय आहेत; कारण त्‍या त्‍या मागे या सर्व संतांची ‘संचित मनःशक्‍ती’ उभी आहे. त्‍यांचे सामर्थ्‍य त्‍या त्‍या ग्रंथांच्‍या मागे उभे आहे.’

– पद्मभूषण सौ. सुधा मूर्ती (‘इन्‍फोसिस’ आस्‍थापनाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती श्री. नारायण मूर्ती यांच्‍या पत्नी), बेंगळुरू

(साभार : संकेतस्‍थळ)