जम्मू-काश्मीरमध्ये रोहिंग्या मुसलमानांसाठी अधिवास प्रमाणपत्र बनवणार्‍या टोळीला अटक

रोहिंग्या महिलांची विवाहासाठी १ लाख रुपयांना होत आहे खरेदी !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये रोहिंग्या घुसखोरांची संख्या वाढत आहे. वर्ष २०१२ पासून ते येथे घुसखोरी करत आहेत. राज्यात आतापर्यंत ८ सहस्र रोहिंग्यांनी घुसखोरी केली आहे. म्यानमारच्या एका महिलेला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर रोहिंग्यांच्या संदर्भात अनेक सूत्रे समोर येत आहे. म्यानमारची रहिवासी असलेली अन्वरा ही काश्मीरमधील रहिवासी तरुणीशी लग्न करून अनेक वर्षे राज्यात रहात होती. वर्ष २०२० मध्ये त्यांनी रहिवासी दाखला मिळवला होता. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक अन्वेषणानंतर प्रमाणपत्रे देणारी महिला कर्मचारी, एक सूत्रधार आणि प्रमाणपत्र प्रसारित करणारा अधिकारी यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिवास प्रमाणपत्र बनवणार्‍या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांचे जाळे काश्मीरमधील वृद्ध, अपंग आणि गरीब लोकांची तस्करी केलेल्या रोहिंग्या महिलांसमवेत लग्न लावून देत असल्याचे उघड झाले. या महिलांना २० सहस्र ते १ लाख रुपयांना विकत घेतले जाते.

रोहिंग्यांच्या विरोधात चालू आहे मोहीम !

केंद्र सरकारने मार्च २०२१ मध्ये घुसखोर रोहिंग्यांची ओळख पटवण्यासाठी मोहीम चालू केली. याअंतर्गत बायोमेट्रिक आणि इतर चाचण्यांनंतर ३०० घुसखोरांना जम्मूच्या हिरानगर कारागृहातील तात्पुरत्या केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. या केंद्रात पोलीस आणि बंदीवान यांच्यामध्ये अनेक वेळा चकमकी झाल्या आहेत. रोहिंग्यांची या केंद्रातून सुटका किंवा म्यानमारमध्ये परतण्याची मागणी आहे.

देशातील रोहिंग्यांची लोकसंख्या १८ सहस्र

गृह मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या हवाल्याने म्हटले आहे की, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात १८ सहस्र रोहिंग्या मुसलमान आहेत. जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, हरियाणा, देहली-एन्.सी.आर्., राजस्थान, मणीपूर आणि भाग्यनगर येथे रोहिंग्या मुसलमान अधिक प्रमाणात रहात आहेत.

संपादकीय भूमिका

देशातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना कधी हाकलणार ? पाकिस्तान ११ लाख अफगाण्यांना हाकलत असतांना भारत कठोर कधी होणार ?