नवरात्रीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’च्या वेळी टाळवादनाची सेवा करतांना साधिकेला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘२६.९.२०२२ ते ५.१०.२०२२ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘देवी होम’ झाला. प्रतिदिन होमानंतर आरतीच्या वेळी मला टाळ वाजवण्याची सेवा मिळाली. ती सेवा करत असतांना मला टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

१. ‘होमाच्या ठिकाणी टाळ वाजवण्यापूर्वी मला ‘मन अस्वस्थ होणे, निरुत्साह आणि जडपणा जाणवणे’, असे त्रास होत होते.

२. यज्ञकुंडाच्या परिसरात प्रवेश करताच एका दैवी ऊर्जेने भारित झाल्यासारखे वाटणे आणि सेवा झाल्यावर १० ते १५ घंटे ती ऊर्जा स्वतःभोवतीच असल्याचे अनुभवता येणे

मी टाळ वाजवण्यासाठी यज्ञकुंडाच्या परिसरात प्रवेश करताच मला अकस्मात् एका दैवी ऊर्जेने भारित झाल्यासारखे वाटून उत्साह जाणवत असे आणि हलके वाटत असे. टाळ वाजवण्याची सेवा झाल्यावर साधारण १० ते १५ घंटे ती ऊर्जा माझ्या अवतीभोवतीच असल्याचे मला अनुभवता येत असे. नवरात्रीनंतर दीड मास झाल्यावरही ती ऊर्जा काही प्रमाणात माझ्या अवतीभोवती असल्याचे मला जाणवत होते.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पहातांना आलेल्या अनुभूती

अ. ‘टाळवादनाची सेवा करत असतांना देवीचे चित्र आणि गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र यांच्याकडे पहाण्याऐवजी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चेहर्‍याकडे, तर कधी त्यांच्या चरणांकडे पहात रहावे’, असे मला वाटत असे.

आ. काही वेळा त्या दोघींकडे पहात असतांना ‘त्यांच्या रूपात साक्षात् आदिशक्ती जगदंबा प्रगट झाली आहे’, असे मला जाणवत असे.

इ. त्या दोघी एकरूप होऊन विशाल स्वरूपात मला दिसत असत.

ई. ही अनुभूती घेत असतांना आणि नंतरही ‘त्या अनुभूतीतच रहावे’, असे मला वाटत असे.

४. टाळवादनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

४ अ. एका टाळेने दुसर्‍या टाळेच्या काठावर आघात करून टाळ वाजवणे : या वेळी टाळेतून येणारा नाद मृदू आणि आल्हाददायक असा असतो. तो वातावरणात घुमतो आणि त्यातून आनंद मिळतो. त्या वेळी ‘अनेक कळ्या उमलल्याप्रमाणे आनंदाचे तरंग वातावरणात प्रक्षेपित होत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

४ आ. एका टाळेने दुसर्‍या टाळेच्या मध्यभागी आघात करून टाळ वाजवणे : या वेळी येणार्‍या नादाची मृदूता तुलनात्मकदृष्ट्या अल्प जाणवली. तेव्हा ‘टाळवादनाच्या नादातील सातत्य खंडित होते आणि वातावरणात नादतरंग प्रक्षेपित होण्याची गती मंदावते’, असे माझ्या लक्षात आले. ‘या प्रकारच्या वादनातून मिळणारा आनंद तुलनात्मकदृष्ट्या अल्प आहे’, असे मला जाणवले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर आरती म्हणणारी साधिका प्रतिदिन निराळी असूनही तिच्या गायनाशी टाळाची गती जुळणे

ही सेवा करत असतांना एका साधिकेने मला सांगितले, ‘‘टाळवादन आणि आरतीचे गायन मागे-पुढे तर होत नाही ना ?’, याकडे लक्ष दे.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आरती म्हणणारी साधिका प्रतिदिन निराळी आहे. प्रत्येक साधिकेचा आवाज आणि गायनाची पद्धत निराळी असल्याने तिच्या गायनाशी टाळाची गती लगेच जुळणे काही वेळा शक्य होईलच, असे नाही.’ १ – २ वेळा संबंधित साधिकांच्या समवेत माझा टाळवादनाचा सरावही झाला नव्हता. ‘या स्थितीत देवच सर्व जुळवून आणू शकतो’, असा विचार मनात येऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, ‘तुम्ही दिलेली सेवा तुम्हीच माझ्याकडून करून घ्या आणि आरतीच्या गायनाला टाळाची गती कशी जुळवायची ?’, हे मला शिकवा.’ त्यानंतर दोन साधिकांनी मला सांगितले, ‘‘तू टाळ चांगले वाजवतेस.’’ तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरच त्यांच्या माध्यमातून माझे कौतुक करत आहेत’, असे जाणवून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

६. ‘टाळवादन आणि गायन यांची गती जुळत नसल्याने तुझी टाळवादनाची सेवा रहित होऊ शकते’, असे एका साधिकेने सांगणे अन् देवीला प्रार्थना केल्यावर वादनाची सेवा करण्याचा निरोप मिळणे

एकदा एका साधिकेने मला सांगितले, ‘‘तुझी टाळवादनाची गती आणि गायन करणार्‍या साधिकांची गायनाची गती जुळत नाही. तुझी टाळ वाजवण्याची सेवा रहित होऊ शकते.’’ तेव्हा टाळ वाजवण्याची संधी म्हणून नव्हे, तर ‘यज्ञकुंडाच्या परिसरात ही सेवा करतांना मला अनुभवता येणारे चैतन्य खंडित न होता मला मिळतच रहावे’, असे मला वाटले. मला देवीचे दर्शन हवे असल्याने मी देवीला प्रार्थना केली, ‘मला क्षमा कर. ‘माझे काय चुकते ?’, ते मला कळू दे. तूच माझ्याकडून ही सेवा भावपूर्ण करून घे.’ तेवढ्यात मला ‘ही सेवा तुलाच करायची आहे’, असा निरोप मिळाला. तेव्हा ‘माझा अहं वाढू नये आणि शरणागती वाढावी; म्हणून देवाने माझ्यावर केलेली ही कृपा आहे’, हे माझ्या लक्षात आले.

७. पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी यांनी गायलेले गीत आणि देवीचा गोंधळ ऐकतांना आलेल्या अनुभूती

अ. यावर्षी नवरात्रीत प्रथमच पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत, वय ७५ वर्षे) यांनीही दोन वेळा गायनसेवा केली. तेव्हा ‘पू. आजींनी गायलेले गीत आणि देवीचा गोंधळ ऐकतांना त्यांतील चैतन्य लगेच माझ्या अंतर्मनात जात आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘माझ्या अनाहतचक्राच्या भोवती भावाचे वलय सिद्ध होण्याची प्रक्रिया (भावनिर्मितीची प्रक्रिया) वेगाने होत आहे’, असे मला अनुभवता आले.

८. प्रतिदिन वेगवेगळ्या साधिकांचे गायन ऐकत असतांना ‘मी काही वेळा गंधर्वलोकात, तर काही वेळा उच्चतम अशा नादविश्वात आहे’, असे मला जाणवत होते. याचे वर्णन शब्दांत करणे कठीणच आहे.

९. श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांचे तबलावादन ऐकतांना आलेल्या अनुभूती

अ. श्री. गिरिजय प्रभुदेसाई (तबला विशारद) यांचे तबलावादन ऐकतांना ‘आपण शिवलोकात असून तेथे आदिशक्तीचे पूजन होत आहे आणि तबलावादनाऐवजी मृदंगवादन होत आहे’, असे मला जाणवत होते.

आ. त्यांनी केलेल्या तबलावादनावर माझ्याकडून मानसरित्या नृत्य केले जात होते. त्या वेळी मला पुष्कळ आनंद मिळाला.

१०. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५४ वर्षे) यांचे सतारवादन ऐकतांना ‘ते आणि ऐकणारे सर्व साधक यांच्यावर माता सरस्वतीची अपार कृपा होत आहे’, असे मला जाणवले.

११. देवीच्या गोंधळाचे गीत ऐकतांना आलेल्या अनुभूती

अ. कु. मयुरी आगावणे यांनी सहसाधिकांच्या समवेत देवीच्या गोंधळाचे एक गीत सादर केले. तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले आणि क्षणात वातावरणात पालट होऊन मला उत्साह जाणवू लागला.

आ. त्या वेळी श्री. गिरिजय प्रभुदेसाई प्रत्यक्षात तबल्याची साथ करत होते; परंतु ते वादन ऐकतांना ‘जणू संबळच (टीप) वाजत आहे’, असे मला जाणवले.

टीप – संबळ : हे एक चर्मवाद्य असून देवीच्या ‘गोंधळात’ गोंधळी हे वाद्य वाजवतात.

१२. टाळवादनाची सेवा करतांना आरती म्हणणार्‍या साधिकांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

–  होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, फोंडा, गोवा. (१९.११.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक