‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !

नवरात्रोत्सव मंडळे आणि गरबा आयोजक यांना हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

मुंबई – नवरात्रोत्सवाला आरंभ झाला आहे. आदिशक्तीचा जागर करण्याचा हा उत्सव; मात्र याच काळात ‘लव्ह जिहादी’ धर्मांध स्त्रीशक्तीचा घात करण्यासाठी सरसावतात. स्वतःची खरी ओळख लपवून हिंदु नाव धारण करून, गंडेदोरे बांधून लव्ह जिहादी गरब्यात शिरतात. त्यामुळे या काळात हिंदु मुली-महिला ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येतात. या पार्श्‍वभूमीवर हिंदु मुली आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहिंदूंना गरब्यात प्रवेशबंदी करावी आणि असा मोठा फलक प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने नवरात्रोत्सव मंडळे आणि गरबा आयोजक यांना केले आहे.

समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. नुकतेच राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हिच्याशी हिंदु म्हणून ओळख सांगत विवाह करणार्‍या आणि नंतर इस्लाम स्वीकारण्यासाठी मारहाण करणारा तिचा पती रकीबुल हसन याला झारखंड येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची, तर धर्मांतरासाठी दबाव आणणार्‍या रकीबुलच्या आईला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातून ‘लव्ह जिहाद’ पुन्हा एकदा कायदेशीरदृष्ट्या सिद्ध झाला आहे.

२. गेल्या काही वर्षांत हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरित करण्यात आले आहे, तर याला विरोध करणार्‍या अनेक हिंदु तरुणींच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’विषयी केवळ हिंदु संघटनाच नव्हे, तर अनेक ख्रिस्ती संघटना आणि ख्रिस्ती धर्मगुरु यांनीही आवाज उठवला आहे. तसेच केरळमधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी आणि कम्युनिस्ट पक्षाचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस्. अच्युतानंदन यांनी, तसेच केरळ उच्च न्यायालयानेही ‘लव्ह जिहाद’ची भीषणता मान्य केली आहे.

३. यामुळेच देशातील ६ राज्यांत ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात आला असून महाराष्ट्र, गोवा आदी राज्यांत हा कायदा बनवण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्रात हा कायदा व्हावा, यासाठी समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोठ्या संख्येने मोर्चे काढले आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांनीही ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याची ग्वाही दिली आहे.

४. याच पार्श्‍वभूमीवर हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवण्यासाठी गरब्याच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर सुरक्षाव्यवस्था उभारावी. यामध्ये गरब्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाचे आधारकार्ड तपासावे, त्यांच्या नावांची खात्री करावी आणि मगच प्रवेश द्यावा. तसेच प्रत्येक मुलाला-पुरुषाला आत जातांना टिळा लावावा. जेणेकरून अहिंदू ‘लव्ह जिहाद्यां’ना या उत्सवापासून दूर ठेवता येईल, परिणामी हिंदु मुली-महिला सुरक्षित रहातील.