मणीपूरमधील हिंसाचारामागे बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटना  ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची माहिती

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या ४ मासांपासून चालू असलेल्या हिंसाचारामागे बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटनांचा हात असल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केली आहे. या संघटना मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि हिंदु मैतेई समाज यांच्यावर आक्रमण करण्यासाठी आतंकवाद्यांची भरती करत आहेत. मणीपूरमध्ये ४ मासांमधील हिंसाचारामध्ये आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच शेकडो घरे जाळण्यात आली आहेत. सहस्रो लोकांना पलायन करावे लागले आहे. शेकडो आश्रयगृहांमध्ये सहस्रो लोकांनी शरण घेतली आहे. येथील इंटरनेट सेवा बंद आहे.

मणीपूर शांत होऊ न देण्याचे षड्यंत्र !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या चौकशीतून लक्षात आले की, बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटना भारत सरकारच्या विरोधात युद्ध करण्याच्या हेतूनेच वेगवेगळ्या समूहांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी भारतातील कट्टरतावादी नेत्यांना समवेत घेऊन षड्यंत्र रचले आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत मणीपूर शांत होऊ द्यायचे नाही.

भारतातील अन्य आतंकवादी संघटनांचे मिळत आहे साहाय्य !

अन्वेषणातून मिळालेल्या माहितीमध्ये या आतंकवादी संघटनांचे नियंत्रक मणीपूरमध्ये हिंसाचारासाठी शस्त्रे, दारूगोळा आणि अन्य साहित्य विकत घेण्यासाठी अर्थपुरवठा करत आहेत. त्यांना यासाठी भारतातील ईशान्य भारतात सक्रीय असणार्‍या अन्य आतंकवादी संघटनाचे साहाय्य मिळत आहे. तसेच म्यानमारमधील आतंकवादी संघटनांचे आतंकवादी मणीपूरमध्ये घुसखोरी करून तेथील हिंदु मैतेई आणि सुरक्षादल यांच्यावर आक्रमण करत आहेत. यातून त्यांना हिंसा वाढवायची आहे. त्यांच्याकडून करण्यात येणार्‍या गोळीबारांचे काही व्हिडिओही समोर आले आहेत.

सीमेवरील विशेष सोयीचा घेतला जात आहे अपलाभ !

भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये १ सहस्र ६४३ किलोमीटरची सीमा आहे. या सीमांवर तारांचे कुंपण घातलेले नाही. त्यामुळे येथील नागरिक एकमेकांच्या सीमेमध्ये सहज ये-जा करू शकतात. तसेच वर्ष २०१८ मध्ये ‘फ्रि मूव्हमेंट रिझीम’ अंतर्गत ईशान्य भारतातील ४ राज्यांतील काही जातींचे नागरिक म्यानमारमध्ये १६ किलोमीटरपर्यंत आत जाऊ शकतात, तसेच म्यानमारचेही लोक भारतात येऊ शकतात. या सोयीचा अपलाभ घेऊन आतंकवादी भारतात घुसखोरी करत असतात. त्यांची भाषा आणि संस्कृती एकसारखी असल्याने त्यांना ओळखता येत नाही.

संपादकीय भूमिका 

  • आता सरकारने या माहितीच्या आधारे या देशांतील सरकारांकडे आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करावी. त्यांनी कारवाई केली नाही, तर भारताने या देशांत जाऊन स्वतः कारवाई करून मणीपूर शांत करावे !
  • बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटना भारतात हिंसाचार करणार आहेत, हे भारतीय गुप्तचरांना आधीच का समजले नाही ? आताही हे समजण्यासाठी ४ मास का जावे लागले ? असे प्रश्‍न उपस्थित होतात !