महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच १० लाखांहून अधिक मतदार आढळले मयत !

  • निवडणूक आयोगाने केलेल्या मतदार सर्वेक्षणात माहिती उघड !

  • कोरोनामुळे मयत मतदारांच्या संख्येत वाढ !

  • ६१ सहस्र ७४९ मतदारांची नावे दोनदा !

मुंबई – येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राज्यात चालू असलेल्या मतदार सर्वेक्षणात मयत मतदारांची संख्या १० लाख ८५ सहस्र १९५ इतकी आढळली आहे. राज्यात झालेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या मतदार सर्वेक्षणातील मयत मतदारांची इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी संख्या आहे.

वर्ष २०१९ आणि २०२० या कालावधीत कोरोना महामारीमुळे मयत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे.  आतापर्यंत राज्यातील ८ कोटी ५१ लाख ४० सहस्र ७९९ मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही ५ टक्के मतदारांचे सर्वेक्षण व्हायचे आहे. त्यामुळे मयत मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

५० सहस्रांहून अधिक मयत मतदारांची संख्या असलेली ५ शहरे ! 

पुणे येथे सर्वाधिक ८१ सहस्र १११ मयत मतदार आढळले. नागपूर ५३ सहस्र ५१७, सोलापूर ५९ सहस्र ४६२, सातारा ७५ सहस्र १०५, कोल्हापूर ५५ सहस्र १९७, तर सांगलीत ५० सहस्र ४७७ इतके मतदार मयत आढळले आहेत. यासह २० ते ५० सहस्र मतदार मयत आढळलेले राज्यात जिल्हे आहेत.

६१ सहस्र ७४९ मतदारांची नावे दोनदा आढळली !

आतापर्यंतच्या सर्वेक्षणात ६१ सहस्र ७४९ मतदारांची नावे दोनदा आढळली आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ सहस्र २७९ मतदारांची नावे दोनदा आढळली आहेत. बुलढाणा २ सहस्र ७८५, अकोला १ सहस्र ३९९, अमरावती १ सहस्र ६१५, वर्धा १ सहस्र २७३, नागपूर ३ सहस्र १३४, भंडारा १ सहस्र ९५४, गोंदिया १ सहस्र २४५, चंद्रपूर २ सहस्र ८०, यवतमाळ १ सहस्र ८५७, नांदेड २ सहस्र ४९८, मुंबई २ सहस्र १५७, पुणे २ सहस्र ५८५, धाराशीव २ सहस्र ४५४, सोलापूर २ सहस्र ६१५, सातारा २ सहस्र ५९१, कोल्हापूर २ सहस्र ३९१ इतके मतदारांची नावे दोनदा आढळली आहेत.

या सर्वेक्षणात १९ लाख ६० सहस्र ९५७ मतदार त्यांच्या निवासाच्या ठिकाणी आढळले नाहीत. ७ लाख २९ सहस्र ७१५ मतदार अन्य राज्यांत स्थलांतरित झाले आहेत. राज्यभरात ४ लाख १९ सहस्र ५३२ जणांची छायाचित्रे स्पष्ट असल्यामुळे (ब्लर) त्यांची पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे.