मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी सरकारला आम्‍ही रिक्‍शा भरून कागदपत्रे देतो ! – मनोज जरांगे, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे, आंदोलनकर्ते

जालना – सरकारने कुठेही न जाता आमच्‍याकडे यावे. आमच्‍याकडे रिक्‍शा भरून कागदपत्रे आहेत. ते पुरावे पाहिल्‍यावर एका दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्‍याविषयीचा अध्‍यादेश काढता येईल, असे प्रतिपादन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ६ सप्‍टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता अंतरवाली सराटी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केले. मनोज जरांगे यांच्‍या कुणबी प्रमाणपत्राच्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी सरकारने निवृत्त न्‍यायाधिशांच्‍या अध्‍यक्षतेखाली १ समिती गठीत केली आहे. ही समिती भाग्‍यनगर (हैद्राबाद) येथे जाऊन कुणबी कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर जरांगे यांनी ही भूमिका मांडली.

आजची पत्रकार परिषद अचानक बोलावण्‍याचे कारण म्‍हणजे ४ दिवसांनंतर सरकारने परत वेळ वाढवण्‍यापेक्षा कागदपत्रे किंवा पुरावे पहावेत. ‘अध्‍यादेश काढायचे म्‍हटले, तर पाठिंबा पाहिजे’, असे मंत्रीमंडळातील मंत्री, सचिव आणि अधिकारी यांचे म्‍हणणे असेल, तर एका दिवसात अध्‍यादेश काढता येईल, एवढे पुरावे द्यायला आम्‍ही सिद्ध आहोत. सरकारने १ मासाची मुदत मागण्‍याची आवश्‍यकता नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.