पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

सनातन धर्म संपवण्याविषयीच्या विधानावर द्रमुकचे नेते तथा तमिळनाडू मंत्री उदयनिधी स्टॅलिन ठाम !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करण्याविषयी केलेल्या विधानावर अद्यापही ठाम आहेत. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारता’ची चर्चा करतात, म्हणजे काँग्रेसवाल्यांना मारायचे का ? भाजपला ‘इंडिया’ आघाडीची भीती वाटते आणि त्याची दिशाभूल करण्यासाठी ते सर्व बोलत आहेत. द्रमुकचे धोरण ‘एक कुळ, एक देव’ असे आहे.

(म्हणे) ‘सनातन धर्म संपला पाहिजे’, असे मी सतत म्हणीन !’

उदयनिधी पुढे म्हणाले की, मी पुन्हा सांगत आहे की, मी केवळ सनातन धर्मावर टीका केली असून ‘सनातन धर्म संपला पाहिजे’, असे मी सतत म्हणीन. काही लोक बालिशपणाने वागत आहेत आणि मी हत्याकांडासाठी चिथावणी दिल्याचे सांगत आहेत. काही लोक द्रविडांना विचारसरणी नको असल्याविषयी बोलतात. याचा अर्थ द्रमुकच्या लोकांनाही मारले पाहिजे का ? सनातन म्हणजे काय ? ‘सनातन म्हणजे काहीही पालटू नये आणि सर्व शाश्‍वत आहे;’ पण द्रविडांची विचारसरणी पालटाची मागणी केली जाते आणि ‘प्रत्येक जण समान असावा’, असे मत मांडले जाते.

संपादकीय भूमिका

  • जर उदयनिधी यांना वाटते की, एखाद्याला संपवणे म्हणजे मारणे, असे होत नाही, तर ते जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?
  • सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्यास सांगितलेले नाही कि सनातनच्या लाखो वर्षांच्या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्यांनी जनतेला विस्तृतपणे सांगायला पाहिजे !