चितावणीखोर वक्तव्य करणार्‍या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करा ! – ‘मी इचलकरंजीकर’ संघटनेच्या वतीने निवदेन

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – सुळकूड पाणी योजनेवरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘ही योजना झाल्यास रक्तपात होईल’, तर माजी आमदार के.पी. पाटील यांनीही कर्नाटकमधील नागरिकांना भडकवणारे विधान केले आहे. त्यामुळे चितावणीखोर वक्तव्य करणार्‍या मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के.पी. पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ‘मी इचलकरंजीकर’ संघटनेच्या वतीने ३० ऑगस्टला अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजीसाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी शासनाने ‘दुधगंगा उद्भव सुळकुड पाणीपुरवठा’ योजना राबवण्यात येत आहे. दुसरीकडे राजकीय नेते राजकीय लाभासाठी सामान्य लोकांत हाणामारी होण्यासाठी चिथावणीखोर भाषणे करत आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय मते मिळण्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवायचे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे याची नोंद घेऊन या दोन्ही नेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात काही अप्रिय घडल्यास या नेत्यांना उत्तरदायी ठरवावे. या वेळी अमित कुंभार, उमाकांत दाभोळे, विशाल माळी, मुकुंद तारळेकर, प्रमोद पाटील, सुनील जाधव यांसह अन्य उपस्थित होते.