पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला विश्वगुरु बनवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावूया ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना खासदार श्री. धनंजय महाडिक, तसेच अन्य

कोल्हापूर, ६ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. यात कोल्हापूर-मुंबई बंद झालेली सह्याद्री रेल्वे चालू करण्यासाठी देहली येथे २ बैठका झाल्या आहेत.‘वन्दे भारत’ रेल्वे चालू करण्यासाठी जे सक्षम ‘रेल्वे ट्रॅक’ लागतात ते कोल्हापूर-मिरज या स्थानका दरम्यान नाहीत; मात्र लवकरच त्यांचेही सक्षमीकरण होईल. ते झाले की कोल्हापूर-मुंबई ‘वन्दे भारत’ रेल्वे चालू होऊ शकेल. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची सातत्याने नवनवीन संकल्पना राबवत आहेत. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला विश्वगुरु बनवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यात महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.

या प्रसंगी पुणे विभागाचे रेल्वे अधिकारी प्रकाश उपाध्याय, स्वातंत्र्यसैनिक श्री. वसंतराव माने आणि श्री. कलगोंडा पाटील, भाजपचे सर्वश्री विजय जाधव, अमल महाडिक, राहुल देसाई यांसह अनेकजण उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. महाडिक पुढे म्हणाले, ‘‘प्रारंभी कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी ६ कोटी रुपये संमत करण्यात आले होते. नंतर मी पाठपुरावा केल्यावर १८ कोटी आणि आता ४३ कोटी रुपये कोल्हापूरच्या रेल्वे विस्तारिकरणासाठी व्यय होणार आहेत. देशभरात २५ ‘वन्दे भारत’ रेल्वे चालू असून प्रत्येक आठवड्याला १  ‘वन्दे भारत’ रेल्वे सिद्ध होत आहे. कोल्हापूर विमानतळाचे प्रवेशद्वार करण्यसाठी आपण वैशिष्ट्यपूर्ण दगड वापरत असून त्याचप्रकारे कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे पुरातन स्वरूप तसेच ठेवून नवीन विस्तारिकरण केले जाणार आहे.’’