ओडिशातील बालासोर रेल्वे अपघात सदोष सिग्नल यंत्रणेमुळेच ! – रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवाल

नवी देहली – ओडिशातील बालासोर येथे गेल्या मासात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या संदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्यांचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. या अहवालामधील सविस्तर माहिती उघड करण्यात आली नसली, तरी सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये २९३ जणांचा मृत्यू झाला होता, तर १ सहस्रांहून अधिक जण घायाळ झाले होते. दुसरीकडे केंद्रीय अन्वेषण विभागाकडूनही या अपघाताचे अन्वेषण करण्यात येत आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसने एका मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला होता. ही एक्सप्रेस ज्या मार्गावरून धावत होती, त्या मार्गावर या गाडीला हिरवा सिग्नल देण्यात आला होता; मात्र नंतर या गाडीचे रुळ पालटून ती शेजारील मालगाडी उभ्या असलेल्या रुळावर वळवण्यात झाली आणि हा अपघात झाला.

संपादकीय भूमिका

सदोष सिग्नल यंत्रणेला उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांना शेकडो प्रवाशांचा बळी घेतल्यासाठी उत्तरदायी ठरवून तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !