कोल्‍हापूरमध्‍ये ‘सद़्‍भावना रॅली’च्‍या नावाखाली कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा डाव !

सकल हिंदू समाजाचे निवेदन

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर येथे औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवणार्‍यांच्‍या विरोधात काही न करता त्‍याला हिंदूंनी दिलेल्‍या प्रत्‍युत्तराविषयी ‘सद़्‍भावना रॅली’ काढण्‍यात येत आहे का ? काश्‍मीर, बंगाल, केरळ येथे हिंदूंच्‍या हत्‍या झाल्‍या, तेव्‍हा कुणी ‘सद़्‍भावना रॅली’ का काढली नाही ? महाराष्‍ट्रात ‘लव्‍ह जिहाद’, धर्मांतर, तसेच श्रीरामनवमी, हनुमान जयंतीच्‍या निमित्ताने निघालेल्‍या फेर्‍यांवर आक्रमणे करण्‍यात आली, तेव्‍हा ‘सद़्‍भावना रॅली’ का काढण्‍यात आली नाही ? त्‍यामुळे ‘सद़्‍भावना रॅली’च्‍या नावाखाली कोल्‍हापुरातील कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा पुरोगाम्‍यांचा डाव असून या ‘रॅली’च्‍या नावाखाली हिंदूंना दंगलखोर ठरवण्‍याचा प्रयत्न झाल्‍यास हिंदू ते खपवून घेणार नाहीत, असे मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे असलेले निवेदन कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्‍वप्‍नील पवार यांना सकल हिंदू समाजाच्‍या वतीने देण्‍यात आले.

या प्रसंगी ‘राष्‍ट्रहित प्रतिष्‍ठान’चे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. शरद माळी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्‍यक्ष श्री. गजानन तोडकर, सेवाव्रत प्रतिष्‍ठानचे श्री. संभाजी साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, बजरंग दलाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. पराग फडणीस, भ्रष्‍टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्‍यक्ष श्री. आनंदराव पवळ, छत्रपती संभाजीराजे स्‍मारक समितीचे श्री. ओंकार शिंदे, भाजप युवामोर्चाचे श्री. अमेय भालकर, शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख श्री. उदयभाऊ भोसले उपस्‍थित होते.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे असलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, गेल्‍या दोन मासांपासून धर्मांधांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्‍या घटनांमुळेच ७ जून या दिवशी हिंदूंचा उद्रेक झाला. त्‍यामुळे ही शांतता बिघडवण्‍याचे काम कोण करत आहे ? याचे अन्‍वेषण अगोदर झाले पाहिजे. औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवण्‍यामागील मुख्‍य सूत्रधार कोण आहे ? याचे विशेष पोलीस पथकाद्वारे अन्‍वेषण केले जावे.