तिवरे (चिपळूण) गावात दीडशे ‘वृक्षरोप’ लागवड अभियान

तरुणांनी पुढाकार घेऊन वृक्षसंवर्धनाचे दायित्व स्वीकारले !

तिवरे (चिपळूण) – कोकणात लांबलेल्या पावसाच्या आगमनदिनी मोठ्या उत्साहात २४ जून या दिवशी येथील दसपटी विभागाच्या श्रीरामवरदायिनी शिक्षण संस्था आकले संचलित न्यू इंग्लिश स्कूल तिवरे विद्यालयाचे प्रांगण हिरवेगार करण्याच्या हेतूने वृक्षरोप लागवड अभियान पार पडले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध बीजपुरवठादार ‘वनश्री’ महेंद्र घागरे, रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर, निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तिवरे शाळेतील विद्यार्थ्यांनी, मान्यवरांसह ढोल-ताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढली. यानंतर औक्षण, श्री सरस्वती आणि वृक्षपूजन करण्यात आले. या वृक्षरोप लागवड अभियानासाठी निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक यांनी त्यांच्या रोपवाटिकेतून १५, सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश (बापू) काणे यांनी १०, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी १०, सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या वतीने सहयोग कराडे आणि सहकार्‍यांनी १५ वृक्षरोपे उपलब्ध करून दिली. तिवरे विद्यालयाच्या आवारामध्ये ५० वृक्षरोपे आणि श्री व्याघ्रांबरीदेवी मंदिर परिसरात अन् गावठणमध्ये १०० वृक्षरोपे लावण्यात आली. १०० रोपे माजी विद्यार्थ्यांनी विकत आणली. प्रतिवर्षी अधिकाधिक पारंपरिक वृक्षरोप लागवड करून गावातील ‘देवराई’ जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प या वेळी तरुणांनी घोषित केला.

‘सह्याद्री’ ही न बोलता भरपूर देणारी संपत्ती ! – ‘वनश्री’ महेंद्र घागरे

आजूबाजूला असलेली ‘सह्याद्री’ची संपत्ती बोलणारी नसली, तरी भरपूर देणारी आहे. पिढ्यान्‌पिढ्या आपल्यावर या वृक्षराजीचे उपकार आहेत. तिची तोड न करता संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व आपले सर्वांचे आहे. प्रत्येक गोष्टीत शासनाकडे बोट न दाखवता आपण स्वतः स्वत:च दायित्व उचलायला शिकले पाहिजे.

संपूर्ण दसपटीत वृक्षरोप लागवड चळवळ पसरावी ! – नीलेश बापट

तिवरे गावात गेली ३० वर्षे येतोय. आज पिढी बदललेली आहे. निसर्गातील प्रत्येक घटक आपली पुढची पिढी सक्षम घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसे आपण प्रयत्न करूया. दसपटीत वृक्षरोप लागवड चळवळीची झालेली सुरुवात या भागात सगळ्या गावांत पसरावी.

प्रत्येकासाठी ‘पर्यावरण’ शिक्षण काळाची आवश्यकता ! – धीरज वाटेकर

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत पुढे आला आहे. भविष्यात या लोकसंख्येला पुरवू शकेल इतकी संसाधने आपल्याकडे उपलब्ध असतील का? त्यामुळे पर्यावरणीय आव्हानांबद्दल जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी आहे. होईल, समज वाढेल. पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकाला पर्यावरणीय शिक्षण आवश्यक आहे.

वाटेकर यांनी ‘बापट आणि घागरे’ यांच्यासारख्या पर्यावरणातील जाणकार व्यक्तीमत्त्वांचा आज लाभलेला सहवास स्मरणबद्ध करावा’, असे आवाहन विद्यार्थ्याना केले. ग्रामदैवत श्री व्याघ्राम्बरीदेवीच्या मंदिर सभागृहात आभार मानतांना वाटेकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलेली ‘गावाचा वाढदिवस’ ही संकल्पना विशद केली. ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेक वर्षांपूर्वी दिला होता. याच दिवशी ‘राळेगणसिद्धी परिवार’ गावाचा वाढदिवस साजरा करते याची माहिती त्यांनी दिली. या माध्यमातून सामाजिक प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न होतो. तिवरे गावात एकवटलेल्या युवाशक्तीने गावाची प्रतिष्ठा वाढवण्याकामी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमाला ‘सर्पमित्र’ अनिकेत चोपडे, केंद्रप्रमुख सौ. शैलजा आखाडे, रामभाऊ लांडे, पर्यावरण मंडळाचे कार्याध्यक्ष एम्. के. पाटील, सौ. मायावती शिपटे, सौ. संगिता गावडे, निवृत्त अभियंता सतीश वीरकर, तिवरे संस्था उपाध्यक्ष आणि शाळा समिती चेअरमन नरसिंगराव शिंदे, प्रसिद्ध ट्रेकर अरुण पुजारे, माजी सरपंच हनुमंत शिंदे, हरिश्चंद्र शिरकर, निवृत्त प्रा. सुरेश जांबोटकर सर, सौ. सुजाता जांबोटकर, रवींद्र कुलकर्णी, रवींद्र शिंदे, विकास शिंदे, रवींद्र गवळे, सौ. तृप्ती कुबडे, विजय जांभळे, कृष्णाजी शिंदे, राकेश शिंदे, विश्वास शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक शाळेच्या माजी विद्यार्थी समूहाचे प्रतिनिधी अमित शिंदे, प्रतिक शिंदे सहकारी विपुल शिंदे, सचिन शिंदे, वैभव कदम, धनंजय शिंदे, सौरभ शिंदे, ओंकार शिंदे, प्रशांत शिंदे, निखिल शिंदे, साहिल शिंदे, चैतन्य शिंदे, मंगेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीधर जोशी, तर आभार उत्तम शिंदे यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि युवावर्ग विशेष मेहनत घेत आहेत.